Breaking News

महिला लोकप्रतिनिधींशी झालेल्या असभ्य वर्तनाचा निषेध: आंदोलन तीव्र करणार बेस्टला भाजपाने दिला इशारा

मुंबई: प्रतिनिधी

२३ जुलै रोजी भाजपचे मुंबई शहरातील नगरसेवक बेस्ट महाव्यवस्थापकांकडे वीज दरवाढ आणि नागरिकांची वीज तोडण्याच्या धमक्यांचा विरोध करण्यासाठी गेले असता यावेळी बेस्ट महाव्यवस्थापक आणि अन्य कर्मचाऱ्यांनी भाजप लोकप्रतिनिधींशी असभ्यवर्तन करत दुर्वव्यवहार केला. पोलिस बळाचा वापर करून घेराव मधून बेस्ट महाव्यवस्थापकांनी पळ काढताना, भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींशी पोलिसांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. यावेळी पुरुष पोलिसांनी महिला नगरसेविका व कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केल्याचा आरोप भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी करत महिला पोलीस उपस्थित असतानाही पुरुष पोलिसांनी महिला लोकप्रतिनिधींशी धक्काबुक्की करत, अरेरावीची आणि शिवीगाळीची भाषा वापरत असभ्य वर्तन केल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या महिला नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, शीतल गंभीर देसाई, स्वप्ना म्हात्रे, रिटा मकवना, नेहल शाह, सरिता पाटील, ज्योत्स्ना मेहता, अनुराधा पोतदार, हर्षिता नार्वेकर यांना पोलीस आणि बेस्ट महाव्यवस्थापकांच्या कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की झाली आहे. पोलिसांच्या या असभ्य वर्तनाचा आणि महाव्यस्थापकांच्या उद्दाम वर्तनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. महिलांशी असभ्य वागणाऱ्या पोलीस आणि बेस्ट कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत. छ. शिवाजी महाराजांचे आणि फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेऊन चालणाऱ्या या राज्यात जर महिला लोकप्रतिनिधींसोबतच जर शासकीय कर्मचाऱ्याकडून असे असभ्य वर्तन होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित असेल हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.

कोरोना टाळेबंदी काळात लोकांचे उत्पन्न कमी झालेले असताना वीज दरात सवलत देण्याऐवजी जनतेला वाढीव वीज देयके पाठविण्यात आली आहेत. त्याविषयात भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट मागितली असता सातत्याने त्यांचेकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्या लोकप्रतिनिधींना भेट दिली गेली त्यांना असमाधानकारक उद्दाम उत्तरे दिली गेली. त्यातच जनतेला एसएमएस करून वाढीव देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी बेस्ट कडून दिली जात आहे. कोरोनाच्या संकटाशी झुंजताना टाळेबंदीमुळे अडचणीत असलेल्या जनतेला याप्रकारे खिंडीत गाठणे हे पूर्णतः अयोग्य आहे. त्यामुळे वाढीव वीज देयकांविषयीचा निर्णय लागेपर्यंत वीज जोडण्या तोडणार नाही असे जाहीर करावी इतकीच मागणी करत काल मुंबई शहर भाजप नगरसेवकांनी आ. मंगलप्रभात लोढा, आ.राहुल नार्वेकर, भाजप मनपा गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेतली. परंतु बेस्ट कालच्या भेटीतही बेस्ट महाव्यवस्थापकांनी लोकप्रतिनिधींना उद्दाम उत्तरे देत मूळ प्रश्नाला सातत्याने बगल दिली. कोरोनाग्रस्त मुंबईबद्दल बेस्ट महाव्यवस्थापकांचे वर्तन अत्यंत असंवेदनशील असल्याचे दिसले. पाच तास घेराव घातल्यानंतरही त्यांनी कुठलाही सकारात्मक प्रतिसाद भाजप नगरसेवकांना दिला नाही. उलट पोलिसी बाळाचा वापर करत त्यांनी तेथून पळ काढला. बेस्ट महाव्यवस्थापकांचे एकूण वर्तन बेजबाबदार, उद्दाम आणि मुंबईकरांप्रती बेफिकिरीचे असल्याची टीका त्यांनी केला.

वास्तविक कोरोना काळात कोणत्याही वीज ग्राहकाची वीज खंडित करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असताना वीज खंडित करण्याची धमकी देऊन बेस्ट महाव्यवस्थापक उच्च न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे बेस्ट महाव्यवस्थापकांवर शासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत वाढीव वीज देयकांच्या विषयात सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तोवर भाजपचे हे आंदोलन सुरूच राहील, किंबहुना ते अधिक तीव्र केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *