Breaking News

अक्षर ओळख शिकणारा ते कष्टकरी चळवळीचा शाहिर-साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे ! सामाजिक जाणिवेतून व्यवस्थेतील त्रुटीवरील भाष्यकार सुबोध मोरे यांचा खास लेख

एकजुटीचा नेता झाला, कामगार तय्यार… !     बदलाया रे दुनिया सारी दुमदुमली ललकार..!       

शेतकरी,अन् दलित जनाला घेऊनिया पाठी…!    कामगार क्रांतीच्या अपुल्या ब्रिदासाठी……..     

कोट करी ध्वजा लाल धरिली……. !   मेधासम आता फळी धरूनी अपुली………  ! .

.            लोकशाहीर, साहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे, “दुनिया बदलायचे”आवाहन करणारे हे गाणं, कष्टकऱ्यांच्या चळवळीत जवळपास सात-आठ दशकं दुमदुमत आहे.कॉ.अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट १९२० हा जन्म दिवस. हे अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. कॉ.अण्णा भाऊ साठे यांची साहित्यरत्न, लोकशाहीर म्हणून साऱ्यांना परिचय आहे. परंतु हा महान कलावंत, साहित्यिक, लोकशाहीर  कष्टकऱ्यांच्या चळवळीतून कसा घडला, त्यांच्या क्रांतिकारी शाहिरीची, साहित्याची वैचारिक जडणघडण ज्या कामगार-कम्युनिस्ट चळवळीत झाली, तो खरा इतिहास, कॉ.अण्णा भाऊ साठे यांचे त्या चळवळीतील प्रत्यक्ष सक्रिय कार्य या जन्मशताब्दी निमित्ताने जाणून घेणे गरजेचे आहे.

कॉ.अण्णा भाऊ साठे १९३० च्या दशकांत आपले तत्कालीन सातारा जिल्ह्यातील मूळ जन्मगाव वाटेगाव सोडून मुंबईत आई-वडीलांसह बालपणी आले. येथे आल्यावर त्यांनी डोक्यावर बोजी वाहणे, फेरीचा धंदा करणे ते गिरणीत लहान पोऱ्या म्हणून कापड गिरणीतही काम केले. १९३४ चा मुंबईत लाल बावटा गिरणी कामगार युनियनच्या नेतृत्त्वाखाली जो ऐतिहासिक संप झाला. त्या संपात ते कामगार म्हणून प्रत्यक्ष सहभागी होते. त्या संपात शिवडी परिसरात कामगार व पोलिसात जी आंदोलनात झटापट-चकमक झाली, त्याचेही ते साक्षीदार होते. तो संप गिरणी कामगारांच्या लढ्यातील शहिदांना, दलित समाजातील परशुराम जाधव यांच्या स्मृतीदिनी म्हणजे २३ एप्रिल १९३४ लाल सुरू झाला होता. परशुराम जाधवांचे पोस्टरही सर्व गिरण्यांच्या गेटवर लावले होते. त्यातून ते कामगार चळवळीकडे आकर्षित झाले. परंतु त्यांचा कम्युनिस्ट चळवळीशी प्रत्यक्ष संबंध ते जेव्हा १९३५-३६ या काळात मुंबईतील धारावी जवळील “माटुंगा लेबर कॅम्प” या कामगारांच्या झोपडपट्टीवजा गलिच्छ वस्तीत रहायला गेले तेव्हा आला. त्याकाळात मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, महापालिका, रेल्वे,गोदीत काम करणारे कामगार तेथे झोपड्या करून रहात असत.

तेव्हा तेथील बांधकाम कामगारांना संघटीत करून युनियन बांधण्याचे काम तत्कालीन कम्युनिस्ट नेते व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे प्रमूख कॉ.आर.बी.मोरे करीत होते. त्यांच्या सोबत युनियनचे काम करणारे कार्यकर्ते कॉ.के.एम.साळवी, जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या “काळाराम मंदिर सत्याग्रहातील” ही प्रमूख कार्यकर्ते होते. अशा या सामाजिक चळवळीतून आत्मभान आलेल्या नेते-कार्यकर्त्यांच्या संपर्कात प्रथम अण्णा भाऊ आले. त्यांच्याकडून अण्णा भाऊंना सामाजिक विषमतेच्या, अन्यायाविरुद्ध झालेल्या लढ्यांची, संघर्षाची माहिती मिळाली. तसेच जगभर कष्टकऱ्यांचे शोषण, पिळवणूकी विरोधात कसे लढे, संघर्ष सुरू आहेत, रशियन क्रांती, तेथील कामगारांचे समाजसत्तावादी राज्य याची माहिती मिळाली. त्याकाळात कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांची वैचारिक जागृती वाढविण्यासाठी कॉ.आर.बी.मोरे, कॉ.बी.टी.रणदिवे, कॉ.एस.व्ही.देशपांडे हे नेते मार्क्सवाद-लेनिनवादाच्या विचारांवरील कामगारांचे अभ्यासवर्ग (स्टडी सर्कल) घेत असत. त्या अभ्यासवर्गातूनच कॉ.के..एम.साळवी, कॉ.शंकर नारायण पगारे, कॉ.किसन खवळे,  कॉ.सरतापे हे लेबर कॅम्पमधील पहिल्या फळीतील कार्यकर्ते तयार झाले होते. नंतर त्यांच्या सोबतच कॉ अण्णा भाऊही अभ्यासवर्गाला हजेरी लाऊ लागले. याच लेबर कॅम्प मधील कार्यकर्त्यांच्या सहवासात राहून अण्णा भाऊ साठे अक्षरशः धुळाक्षरे गिरवत मराठी भाषेतील “क” “ख” “ग” ही अक्षर ओळख शिकले. (कारण त्यांना अस्पृश्यतेमुळे बालपणीच शाळा सोडावी लागली होती.).  अक्षर ओळखीमुळे ते सुरवातीस दुकानांच्या पाट्या, सिनेमा पोस्टर्स वाचू लागले. नंतर ते लेनिन चरित्र, रशियन क्रांतितील सुप्रसिद्ध लेखक मॅक्झिम गॉर्कीची “आई ” कादंबरी, रशियन क्रांतीचा इतिहास, कामगार वाङमय मंडळाने मराठीत प्रकाशित केलेला मार्क्स-एंगल्सचा “कम्युनिस्ट जाहिरनामा” कामगार चळवळीचे “मुंबई कामगार ” साप्ताहिक आदी वाचू लागले, कार्यकर्त्यांकडून समजून घेऊ लागले. यातूनच अण्णा भाऊंची राजकीय-सामाजिक वैचारिक समज वाढू लागली.

त्याच काळात कॉ.आर.बी.मोरेंच्या मार्गदर्शनाखाली कॉ.के.एम.साळवी यांच्या सहकार्याने कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी माटुंगा लेबर कॅम्पमध्ये “दलित युवक संघ ” या तरुणांच्या संघटनेची स्थापना केली व बेरोजगार तरुणांना संघटित करून त्यांना राजकीय सामाजिक चळवळीत सामील करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा तऱ्हेने अण्णा भाऊ कम्युनिस्ट पक्षाच्या, कामगार चळवळीच्या लढ्यात सक्रियपणे भाग घेऊ लागले. त्याच १९३६-३७ च्या दरम्यान अण्णा भाऊ कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत सभासद बनले व पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करू लागले. पक्षातील कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून त्यांनी तेव्हाच्या लेबर कॅम्प मधील मच्छरांवरील पहिले गाणे लिहिले. तेव्हा लेबर कॅम्पमध्ये राहणारे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉ.शंकर नारायण पगारे यांना पुर्वाश्रमीचा “आंबेडकरी जलशाचा”अनुभव होता, त्यांच्याच पुढाकाराने अण्णा भाऊ साठे यांना घेऊन लेबर कॅम्प मधील कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली “दलित युवक संघाचे” पहिले कला पथक उभे राहिले. आणि अण्णा भाऊ कामगार, कष्टकरी चळवळी वरील गाणी लिहू लागले. त्याच काळात कम्युनिस्टांच्याच पुढाकाराने मुंबईत कामगार चळवळीतले जे लढे, संघर्ष सुरू होते, त्या गिरण्यांच्या गेटवर, कामगार मैदानातील सभा, कार्यक्रमात अण्णा भाऊ व सहकारी गाणी कार्यक्रमात गाऊ लागले.

याच कालखंडात राष्ट्रीय स्तरावर १९३६ साली “प्रगतिशील लेखक संघ”या पुरोगामी विचारांच्या साहित्यिकांच्या संघटनेची कम्युनिस्टांच्या पुढाकाराने स्थापना झाली होती. यातील बहुतेक लेखक रशियातील समाजसत्तावादी क्रांतीने प्रभावित झाले होते. ज्यात प्रेमचंद, सज्जाद जाहिर, फैज अहमद फैज, कृष्णचंद्र,  इस्मत चुगताई, ख्वाजा अहमद अब्बास, मंटो, मखदुम मोईद्दीन, राजेंद्र सिंह बेदी, राहुल सांकृत्यायन,मुल्कराज आनंद, कैफी आजमी, सरदार अली जाफरी, मजरुह सुलतानपुरी आदी अनेकांचा सहभाग होता. यापैकी काहींचे साहित्य, तसेच गॉर्की, चेखॉव्ह, तुर्गनेव्ह, टॉलस्टॉय, मायकॉवस्की आदींचे ही साहित्य मराठीत प्रकाशित होत होते. ते देखील अण्णा भाऊ साठे वाचत असत. त्या साहित्याचाही वैचारिक प्रभाव अण्णा भाऊंवर पडू लागला. आणि त्यातूनच अण्णा भाऊंना कथा, ,नाटक, कादंबरी लेखनाची प्रेरणा मिळाली. कम्युनिस्ट चळवळ ही आंतरराष्ट्रीय चळवळ होती व तीला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान असल्याने, जगात ज्या ज्या देशात साम्राज्यवाद, भांडवलशाही, फॅसिझम विरोधात, कष्टकऱ्यांच्या शोषणाच्या विरोधात मुक्ती संग्राम सुरू होते, त्यांचे पडसादही येथील चळवळीत उमटत होते व त्याचा प्रतिरोधही येथील कम्युनिस्टांकडून होत होता. त्याचा परिणामही कॉ.अण्णा भाऊंच्या वैचारिकतेवर होऊ लागला व अण्णा भाऊंना एका वैश्विक दृष्टीकोनाचे भान आले. स्पेन मध्ये १९३६ ला जेंव्हा फॅसिझमचा उदय होऊ लागला व त्या विरोधात जो संघर्ष उभा राहू लागला. तेव्हा त्याचे वृत्तांत कम्युनिस्टांच्या पत्रात प्रकाशित होऊ लागले, तेव्हा ते वाचून व कॉम्रेडसशी चर्चा करून स्पेन मधील फॅसिझम विरोधात १९३९ साली अण्णा भाऊ साठे यांनी पहिला ” स्पेनचा पोवाडा ” लिहिला. ज्याचे मुंबईच्या कामगारवर्गात गिरणी कामगार युनियनतर्फे अनेक कार्यक्रम झाले व कॉ.अण्णा भाऊंची शाहिर म्हणून लोकांना प्रथम ओळख झाली आणि कौतुकही झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात फॅसिस्ट हिटलरने सोव्हिएट रशियावर आक्रमण केले असता हिटलरच्या फॅसिझमच्या विरोधात व रशियातील लाल सेनेने जी रोमहर्षक झुंज दिली त्यांचे वर्णन करणारा अविस्मरणीय ” स्टॅलिनग्राडचा पोवाडा ” १९४२साली लिहिला. अण्णा भाऊंचा हा पोवाडा त्याकाळात खूप गाजला. मुंबईतल्या कामगार चळवळीत या पोवाड्यांचे जोरात स्वागत झाले व अण्णा भाऊंची लोकप्रियताही वाढली. कम्युनिस्ट पक्षाच्या टेरेसवरही “स्टॅलिनग्राडचा पोवाड्याचा” खास कार्यक्रम झाला जो कम्युनिस्ट पक्षाच्या तत्कालीन नेत्यांनीही पाहिला व अण्णा भाऊ यांचे कौतुकही केले. ऐवढेच नव्हे तर कम्यनिस्ट पक्षातर्फे “स्टॅलिनग्राडचा पोवाडा” ही छोटी पुस्तिकाही प्रकाशित करून ती लोकांमध्ये वितरित करण्यात आली होती.          १९३८ ते १९४३-४४ पर्यंत शाहिर अण्णा भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईच्या गिरणगावात जे संप,लढे, संघर्ष सुरू होते त्याच्या पाठींब्यासाठी कला पथकाचे अनेक कार्यक्रम करुन कामगारांमध्ये जागृती करण्याचे मोठे काम केले. अण्णा भाऊंच्या कलापथकाद्वारे होणा-या सांस्कृतिक प्रबोधनाचा फायदा कम्युनिस्ट चळवळीला व्हावा या हेतूने कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतीक आघाडीवर विशेष लक्ष देण्याचे ठरविले. त्याच दरम्यान म्हणजे १९४३ साली कम्युनिस्ट पक्षाचे पहिले अधिवेशन मुंबईतच भरले होते, ज्यात कॉम्रेड पी.सी.जोशी हे अखिल भारतीय सेक्रेटरी निवडले गेले, ज्यांचे साहित्यिक, कलावंतांशी जवळचे संबंध होते. आणि कम्युनिस्ट पक्षाचे मध्यवर्ती केंद्रीय कार्यालयही मुंबईत असल्याने महाराष्ट्रातील प्रमुख शाहिर कलावंतांना मुंबईत एकत्र आणून मुंबईत एक संयुक्त कला पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बार्शी-सोलापूरहून शाहिर कॉ.अमर शेख यांना व कोल्हापूरहून कॉ.दत्तात्रय.न.गव्हाणकरांना मुंबईत पक्षाने बोलाविले. आणि १९४४ साली माटुंगा लेबर कॅम्पमध्ये या तीन प्रमुख शाहिरांसह अन्य कम्युनिस्ट कार्यकर्ते-कलाकारांच्या समावेशाने, ऐतिहासिक “लाल बावटा कला पथक ” या नावाचे कला पथक स्थापन झाले. ज्याचे कॉ.अण्णा भाऊ साठे, कॉ.अमर शेख व कॉ.दत्ता गव्हाणकर हे प्रमूख होते व कॉ.वा.वि.भट हे कला पथकाचे व्यवस्थापक होते. या कलापथकातील कॉ.अण्णा भाऊ साठे यांची जात-वर्ग जाणीवेची आशयसंपन्न गाणी,पोवाडे, लावण्या, लोकनाट्य,कॉ.अमर शेखांचीही गाणी व त्यांचा पहाडी आवाज आणि कॉ.दत्ता गव्हाणकर यांचीही गाणी, लोकनाट्य व त्यांच्या लोकप्रिय चाली, संगीताची साथ व दिग्दर्शन हे सारे जुळून आल्याने लाल बावटा कलापथक मुंबईतील कामगारांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. याच दरम्यान मुंबईच्या जवळील ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे “महाराष्ट्र किसान सभेचे पहिले स्थापना अधिवेशन “जानेवारी १९४५ मध्ये घेण्याचा निर्णय कम्युनिस्ट पक्षाने घेतला होता, ज्यामध्ये कॉम्रेड शामराव परूळेकर व कॉ.गोदावरी परूळेकर व कॉ.बुवा नवले यांचा पुढाकार होता. या ऐतिहासिक अधिवेशनाचा मुंबईसह आसपासच्या ठाणे व कुलाबा जिल्ह्यात प्रचार व जागृती करण्यात “लाल बावटा कलापथकाचा “मोठा वाटा होता. या अधिवेशनासाठी खास कॉ.अमर शेख यांनी लिहिलेले,” किसान सभा शेतकऱ्याची माऊली” हे गाणं व कॉ.नारायण सुर्वे यांचे ” डोंगरी शेत माझं गाव,मी बेनू किती…….” हे खेड्यातील शेतकरी स्त्रीचे दु:ख, कष्ट,व्यथा मांडणारे गाणंही खूप गाजले होते. या अधिवेशनातच कॉ.अण्णा भाऊ साठे, कॉ.अमर शेख व कॉ.दत्ता गव्हाणकर या ” लाल बावटा कलापथकाच्या” तीन प्रमुख शाहिरांची महाराष्ट्रभरातून आलेल्या आदिवासी, शेतकरी व कष्टकरी, कामगार प्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना खरी ओळख झाली. या अधिवेशनातली त्यांची, गाणी, लोकनाट्य गाजली.किसान सभेचा महाराष्ट्रभर प्रसार व्हावा म्हणून, या अधिवेशना नंतर कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, गाऱ्हाणे मांडण्यासाठी खास,” अकलेची गोष्ट ” नावाचे लोकनाट्य लिहिले होते. ज्याचे नंतर महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले व खूप गाजलेही.

१९४३ ते १९४६ या काळात बंगालमध्ये जो भयानक दुष्काळ पडला व लोकांची प्रचंड उपासमार आणि मृत्यू होत होते. त्या दुःखद घटनेला वाचा फोडणारे व त्यांचा आक्रोश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी समग्र माणुसकीला साद घालणारा,” बंगालची हाक ” हा पोवाडा १९४४ साली लिहिला होता. कॉ.अण्णा भाऊ साठे, कॉ.अमर शेख व कॉ.गव्हाणकर हे लाल बावटा कलापथकाच्या आपल्या सहकाऱ्यांसह प्रत्यक्ष बंगाल मध्ये गेले. तेथे त्यांनी त्या पोवाड्याचे,गाण्यांचे अनेक कार्यक्रम करून लाखो रुपये लोकांना मिळवून दिले. हा पोवाडा एवढा गाजला की बंगाल मधील इप्टाच्या कलावंतांनी हा पोवाडा बंगालीत अनुवाद करून त्याचे अनेक कार्यक्रम केले व नंतर तो देशभर गाजला. या पोवाड्याची बंगाली भाषेत एल.पी.रेकॉर्डही नंतर निघाली. इतकेच नाही तर बंगाल मधील इप्टाच्या कलावंतांनी याच पोवाड्यावर “बॅले ” नृत्य नाट्यही लंडन येथील प्रसिद्ध रॉयल थिएटरमध्ये सादर केले होते.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे वैशिष्ट्य हे होते की, मुंबईतील कामगार चळवळ असो, मुंबईतील १९४६ चे नाविकांचे ऐतिहासिक बंडाची असो, शेतकऱ्यांची चळवळ असो, तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा, निजामशाही व जमिनदारांच्या विरोधातील सशस्त्र संग्राम असो, फाळणी वरून पंजाब, दिल्लीत झालेले दंगे असो, चीनमध्ये कम्युनिस्ट पक्ष व कॉम्रेड माओ यांच्या नेतृत्वाखाली चाललेला क्रांतीचा मुक्ती संग्राम असो, किंवा पोलिस गोळीबारात अमळनेरला शहिद झालेल्या शेतकऱ्यांचा प्रश्र्न असो,कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी या सर्व लढ्यांची, संघर्षाची, अत्याचाराची दखल आपल्या गाण्यातून, पोवाडे, लोकनाट्यातून घेतली. अमळनेरात तर ते प्रत्यक्ष कलापथकासह १९४६ ला गेले व सरकारच्या बेछूट गोळीबाराचा निषेध करीत होते. अण्णा भाऊंनी “मुंबईचा गिरणी कामगार” “माझी मुंबई’ “बोनसच्या लढा” “लवादाचा ऐका परकार”,”शेटजीचे इलेक्शन “, “बेकायदेशीर ” आदी.विविध गाणी, पोवाडे, लोकनाट्यातून,मालक-मजूर संबंध, भांडवली लोकशाही, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे होणारे शोषण, फसवणुक यावर प्रल्हाद ओढलेत.त्यांच्या गाजलेल्या ,” मुंबईच्या लावणीत” ते धनिक, श्रीमंतांच्या व गरीब कष्टकर्यांच्या जगण्यातील दारुण विषमतेचे चित्रण करतात. ” जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव ” या गाण्यात ते म्हणतात, ” धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी असेच छळले ” या गाण्यात ते जातीय व वर्गिय शोषणाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दलित-शोषित, कष्टकऱ्यांना घाव घालायला सांगतात. कॉ.अण्णा भाऊ यांच्या कथा, कादंबरीतील नायक,नायिकाही बंडखोर, संघर्षशील आहेत. दलित,शोषित,कष्टकरी, उपेक्षितवर्गाचे नायक साहित्यात सन्मानाने रुजविण्याचे मोलाचे कार्य अण्णा भाऊंनी प्रथम केले. त्यांच्या “फकिरा” कादंबरीचा नायक ब्रिटिश साम्राज्यवाद्यां विरोधात बंड पुकारतो. ही त्यांची गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. या कादंबरीला उत्कृष्ट वाङमयाचा शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच इप्टाच्या सहकार्याने मराठी चित्रपट सृष्टीतील तत्कालीन नामवंत कलाकारांना घेऊन “फकिरा” या नावाचा चित्रपटही निर्मित झाला होता. शाहिर कॉ.द.ना.गव्हाणकर यांनी फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन कडून कर्ज घेऊन त्याची निर्मिती केली होती, आणि कॉ.अण्णा भाऊ व सुप्रसिद्ध लेखक, पटकथाकार ख्वाजा अहमद अब्बास यांनी मिळून त्यांची पटकथा लिहिली होती व दिग्दर्शन कुमार चंद्रशेखर यांनी केले होते. त्यांची “चित्रा” कादंबरी मुंबईतील नाविकांच्या बंडाच्या पार्श्र्वभूमीवर आहे व त्यातील नायिकाही बंडखोर आहे. ही कादंबरी कॉ.अण्णा भाऊ साठे १९६१ ला सोव्हिएत रशियात जाण्यापूर्वी रशियन भाषेत अनुवादित झाली होती.

‌              अण्णा भाऊ साठे हे केवळ शाहिर, साहित्यिकच नव्हते, तर ते कम्युनिस्ट कार्यकर्ते असल्याने त्यांना अनेकदा ब्रिटिश व काँग्रेसी सत्ताधाऱ्यांच्या रोषाला, दडपशाहीला तोंड द्यावे लागले. काही वेळी भुमिगतही रहावे लागले व तुरुंगवासही पत्करावा लागला होता. त्यांच्या लोकनाट्यांवर सरकारने बंदीही घातली होती. अण्णा भाऊ मध्ये एक जागरूक पत्रकारही होता. ते कम्युनिस्ट पक्षाच्या मशाल,लोकयुद्ध, युगांतर या मासिक, साप्ताहिकासाठीही नियमित लिखाण करून दलित-शोषित, कष्टकऱ्यांच्या दु:खाला, समस्यांना वाचा फोडयचे. ते पुस्तक-चित्रपट परिक्षणेही लिहायचे. मुंबईत १९४३ साली स्थापन झालेल्या पुरोगामी विचारांच्या “इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या अखिल भारतीय नाट्य संस्थेच्या स्थापनेतही अण्णा भाऊ साठे यांचा सिंहाचा वाटा होता. ते इप्टाचे १९४९ साली राष्ट्रीय अध्यक्षही होते. मराठीतील दलित व विद्रोही साहित्याचा वैचारिक पाया घालण्याचे कार्य कॉम्रेड अण्णा भाऊंनीच केले. आधुनिक मार्क्सवादी विचारवंत अंतोनियो ग्राम्शी ज्याला ” जैविक बुद्धीजिवी “म्हणतो “ते कॉ.अण्णा भाऊ यांना तंतोतंत लागू होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व त्याच्या निर्मितीमध्ये कॉ.अण्णा भाऊ  व लाल बावटा कलापथकातील त्यांचे सहकारी कॉ.अमर शेख व कॉ.दत्ता गव्हाणकर यांचेही मोलाचे योगदान राहिले होते. परंतु ज्या लोकशाहीरांनी, साहित्यिकांनी देशातील, जगातील, दलित-शोषित, कष्टकऱ्यांचा, उपेक्षितांच्या वेदना, अन्याय, शोषण आपल्या लेखणीतून, गाण्यातून वेशीवर मांडले, आणि त्याविरुद्ध बुलंद आवाज उठविला, त्यांच्या वाट्याला मात्र तथाकथित प्रस्थापित साहित्य संस्कृतीतील ठेकेदारांकडून व तत्कालिन आणि आजच्याही सत्ताधाऱ्यांकडून उपेक्षाच आली. या महाराष्ट्रात पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज,ते यशवंतराव चव्हाण यांच्या नावे प्रतिष्ठानं, अकादमी स्थापन होतात, दिन साजरे होतात, वर्तमानपत्रे पुरवण्या काढतात, चॅनल्स चर्चा घडवितात. परंतु ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला त्या कॉ.अमर शेख,कॉ.अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष आले आणि संपलेही पण त्याचे ना राज्यकर्त्यांना स्मरण ना तथाकथित महान संपादकांना. ते मुठभर उच्चवर्णीय-उच्चवर्गियांनी ज्यांना “स्वातंत्र्यवीर (?), लोकमान्य (?) केले, त्यांच्या वरील दैनिकाच्या  पुरवण्या , विशेषांक काढण्यात व तथाकथित मान्यवरांकडून अग्रलेखांचे वाचनाचे कार्यक्रम आणि वेबिनार, सेमिनार आयोजित करण्यात मग्न आणि यांच्या पुरवण्या वाचून आमच्या मधीलही काही जणांना हे राष्ट्रीय नेते वाटू लागतात हे अधिकच खेदजनक. कॉ.अण्णा भाऊ, अमर शेख व गव्हाणकर यांच्या वाट्याला उपेक्षा येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे,हे सर्व लोकशाहीर ज्या जाती-धर्म व वर्गातून आले होते, ते एक कारण आहे व दुसरे म्हणजे ते प्रस्थापित जाती-वर्गांच्या सत्ताधार्यांच्या विरोधात रोखठोक भुमिका कम्युनिस्ट म्हणून घेत होते आणि तीच प्रस्थापितांना अडचणीचे आहे. तेव्हा मुंबई-महाराष्ट्रातील, देशातील कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीनेच पुढाकार घेऊन या तिन्ही कष्टकर्यांच्या लोकशाहीर, लोककलावंतांचे संयुक्त स्मारक मुंबईत उभारायला हवे. आणि दैनंदिन लढ्यातून, संघर्षातून कॉम्रेड अण्णा भाऊ,अमर शेख व दत्ता गव्हाणकर यांचा क्रांतिकारी विचार कृतीत आणला तरच या जन्मशताब्दी वर्षाचे खरे फलित. कॉम्रेड लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना क्रांतिकारी अभिवादन..!

‌ले.सुबोध मोरे: ९८१९९९६०२९.    

[email protected]

 

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *