मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आतापर्यंत १२ लाख ७० हजार क्विंटल तूरीची खरेदी करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करू नये अशा सूचना बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत. कुठल्याही प्रकारे खरेदी केंद्र बंद होणार नसल्याची ग्वाही देत खरेदीचे चुकारे दिले जातील, अशी माहीती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करतांना मंत्री देशमुख म्हणाले की, या हंगामात तूर, सोयाबीन, हरभरा, मुग, उडीद खरेदी सुरू आहे. यावर्षी देखील साडे चार लाख मेंट्रीक टन तूरीची खरेदी केली जाईल.
आतापर्यंत एक लाख ५ हजार शेतकऱ्यांची सुमारे १२ लाख ६९ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मूग ५४ हजार ३४१ क्विंटल, उडीद ५ लाख ८६ हजार क्विंटल, सोयाबीन २ लाख ६२ हजार क्विंटल तर हरभरा ४ हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे.