मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावत तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हिंदू सरकार आले अन सणांवरील विघ्न टळले अशा आशयाचे जाहिरातींचे फलक मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सर्व पोस्टर आमच्या पक्षाने लावले आहेत. मात्र या पोस्टरवरील वाक्यांचा नेमका अर्थ आमचे अध्यक्ष सांगू शकतील. परंतु हे मात्र खरे आहे की हिंदू सणावरील विघ्न टळले असल्याने लोकांमध्ये आनंद असल्याचे वक्तव्य केले.
जहांगीर आर्ट गॅलरी येथील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
त्याचबरोबर बीडीडी चाळीतील घरांच्या किंमतीची मर्यादा १५ लाख करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी पोलिसांना घर खरेदी करण्यासाठी विभागातंर्गत कर्ज दिले जात होते. मात्र ते बंद करण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरु करण्यात आले असून पोलिस कॉस्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्याला २० लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपाने आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ वरळी नाही तर मुंबईवर आमचे लक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपा असे दोघे मिळून ही निवडणूक नक्कीच जिंकू असा माझा ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने मुंबई प्रदेश कार्यकारिणीत अनेक बदल केले आहे. लढाऊ नेते आशिष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. तर, केंद्रीय मंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार असून ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. पण त्यांच्या सहवासाचा लाभ आम्हाला देखील मिळायला हवा अशी त्यांना विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच निश्चितच राजकीय बैठक होईल, असेही ते म्हणाले.
भाजपाकडून मुंबईत ठिकठिकाणी, आमचे सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न दूर झाले अशी बॅनरबाजी करण्यात येत आहे. हे बॅनर्स भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावतीने लावण्यात आले आहेत. पण निश्चितच हिंदू सणांवरील विघ्न दूर झाल्यामुळे लोकांमध्ये आनंद आहे असे त्यांनी स्पष्ट केले.