राज्यसभेची निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीत महाराष्ट्रातून सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजी राजे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र शिवसेनेकडून त्यांना पक्षात प्रवेश केल्यानंतरच उमेदवारीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना उद्या वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधून घेण्यासाठी या असा निरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठविला असतानाच संभाजी राजे मात्र आपल्याच मतावर ठाम असल्याची माहिती पुढे येत आहे.
यापार्श्वभूमीवर जर उद्या संभाजी राजे वर्षा निवासस्थानी जावून शिवबंधन अर्थात शिवसेनेत प्रवेश नाही केला तर सहाव्या जागेसाठीची निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नरीमन पॉईंट येथील ट्रायटंड हॉटेलमध्ये आज दुपारी माजी खासदार संभाजी राजे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. या शिष्टमंडळात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर आदीजण होते. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळ आणि संभाजी राजे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मात्र मला शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहिर करण्याऐवजी मला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जाहिर करा अशी मागणी संभाजी राजे यांनी या शिष्टमंडळाकडे केल्याची समजते. तसेच जर शिवसेनेत प्रवेश केला तर फक्त महाविकास आघाडीची मते मिळतील, परंतु भाजपाकडे असलेली जास्तीचे मते संभाजी राजे यांना मिळणार नाहीत. या भीतीपोटी संभाजी राजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत.
मात्र शिवसेनेकडून पक्षात प्रवेश घेतल्याशिवाय उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याची भूमिका यापूर्वीच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहिर केली आहे. मात्र शिष्टमंडळाने संभाजी राजे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्या शिवबंधन बांधण्यासाठी वर्षा या शासकिय निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले. तसेच त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: संभाजी राजे यांना फोन करून निमंत्रण दिल्याची माहिती सांगण्यात येत आहे.