मागील तीन टर्मपासून देशातील सर्वच निवडणूका ईव्हीएम मशिन्सद्वारे घेण्यात येत आहेत. मात्र या ईव्हिएम मशिन्सच्या माध्यमातून घेतलेल्या निवडणूकीत फक्त भाजपाचा विजय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची केलेली मागणी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट करत केली.
देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील काही महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागला होता. मात्र, तो जोर धरताना दिसून आला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून बॅलेट पेपरचा मुद्दा उपस्थित केला असून ‘अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या. तो राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानेही येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’, अशी मागणी त्यांनी केली.
कर्नाटकमध्ये ज्या प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या. त्याचप्रमाणे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका-कुशंका आहेत. त्यामुळे प्रयोग म्हणून तरी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी आपली मागणी आहे. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आता नाना पटोले यांनी त्यावेळी उपस्थित केलेल्या या मुद्यावर नंतर महाविकास आघाडी सरकारमधील इतर पक्षांनीही त्याबाबत पुन्हा भाष्य केले नाही की हा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याबाबतचा मुद्दा तसाच पडून राहीला. मात्र नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणूकीत विशेषत: गोव्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व होते. मात्र यंदा तेही दिसले नाही. त्यामुळे बॅलेट पेपरचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडून जाणीवपूर्वक उपस्थित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या ballot paper वर घेतल्या तो राज्याचा निर्णय असतो
महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका #BallotPaper वर घ्यावी @OfficeofUT @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NANA_PATOLE #NoEVM— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022