Breaking News

अदानीच्या मनमानीला राज्य वीज नियामक आयोगाकडून चाप काँग्रेसकडून MERC च्या निर्णयाचे स्वागत

मुंबई : प्रतिनिधी

अदानीच्या वाढीव वीजदराचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार नाही असे निर्देश वीज नियामक मंडळाने देऊन वीज ग्राहकांना मोठा दिलासा आहे. कोळसा खरेदीचा अतिरिक्त भार वीज ग्राहकांच्या माथी मारला जात होता. याप्रकरणी महावितरणने अदानीविरोधात केलेल्या तक्रारीवर वीज नियामक आयोगाने हे निर्देश दिले असून अदानीच्या मनमानी कारभाराला ही सणसणीत चपराक आहे, वीज नियामक मंडळाच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असल्याचे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांनी म्हटले आहे.

महावितरणने अदानी वीज कंपनीविरोधातील ही लढाई जिंकून राज्यातील वीज ग्राहकांचे हित जोपण्याचे काम केले आहे. तिरोडा येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अदानीने जवळच्या विझाग (विशाखापट्टणम) मधून कोळसा खरेदी करण्याऐवजी दहेज या दूरच्या बंदरातून कोळसा खरेदी केला. दहेजमधून कोळसा खरेदी केल्याने दहेज ते तिरोडा या वाहतुकीचा खर्च ५०० रुपये प्रति मेट्रीक टन वाढतो, याचा भूर्दंड महावितरणच्या ग्राहकांना पडत होता. याविरोधात महावितरणने दाद मागितली होती. दहेज बंदर हे तिरोडासाठी जवळचे असल्याचे वीज नियामक मंडळाने मान्य केल्याचा अदानीचा दावाही वीज नियामक मंडळाने फेटाळून लावला. या निकालामुळे वीज ग्राहकांची अतिरिक्त वीजबिलातून सुटका करुन महावितरणने ग्राहकांचे हित जोपासले हे स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले

अदानी पॉवरला दुसरा मोठा झटका..

अदानी पॉवर कंपनीच्या नफेखोरीला आणखी एक झटका बसला आहे. अदानी मुंद्रा कंपनी विरोधातील गुजरात ऊर्जा निगमची याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेतल्याने अदानीचे नफेखोरीचे मनसुबे उधळले असून अदानी पॉवरला हा आणखी मोठा दणका असल्याचे, त्यांनी  सांगितले.

गुजरात उर्जा विकास निगम व अदानीमुंद्रा यांच्यातील करारासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या गुजरात उर्जा विकास निगमची क्युरेटीव्ह पीटीशन सुप्रीम कोर्टाने दाखल करुन घेतल्याने गुजरात ऊर्जा निगमशी केलेल्या वीज खरेदी करारातून अंग काढून घेण्याच्या अदानीच्या भूमिकेला मोठा धक्का बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या नैनी ब्लॉक मधून वीज निर्मितीसाठी कोळसा मिळत नसल्याचे कारण देत अदानी मुद्राने गुजरात ऊर्जा निगमशी केलेल्या वीज खरेदी करारातून बाहेर पडण्यासाठी जुलै २०१९ रोजी जस्टिस मिश्रा यांच्या खंडपीठासमोर दाद मागितली होती आणि अदानी मुंद्राची मागणी कोर्टानेही मान्य केली होती. या करारातून बाहेर पडल्यास अदानी मुंद्राला ६००० कोटी रुपयांचा फायदा होणार होता. या वीज करारातून बाहेर पडून दिल्ली व मुंबईतील उद्योग व व्यवसायातील ग्राहकांना वीज पुरवठा करून जास्तीचा नफा मिळवण्याचा अदानीचा मानस होता. पण सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करुन घेतल्याने अदानीसाठी हा मोठा धक्का असल्याचे ते म्हणाले.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *