मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा – वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप करत हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन कोटी लोकांचे लसीकरण करत नवा विक्रम स्थापन केल्याचा दावा भाजपासह अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलेल्या महत्व आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जर पावणेतीन कोटी लसीकरण काल झाले तर आज आणि उद्या का नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत जर पहिल्यांदा लसीकरण केले असते तर लोकांना जास्त लाभ झाला असता मात्र एखाद्या व्यक्तीच्या ‘महिमा’ साठी अशाप्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून लसीची निर्मिती झाल्यापासून ते आतापर्यत अनेक राज्याना मागणीप्रमाणे लस उपलब्ध होत नसल्याबाबतची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही प्रत्येक राज्यांना समसमान प्रमाणात लसींचे वाटप केले नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच देशातील नागरीकांना लस देण्यासदंर्भात सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप करत केंद्रांच्या वागणूकीवर ताशेरे ओढत लस वाटपाचा आराखडा सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले होते.
त्यानंतरही अनेक राज्यांना लसींचा पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही यासंदर्भात अनेक राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह विरोधकांनीही याबाबत जाहिर वाच्यता केली. विशेषत: महाराष्ट्रात अद्यापही अनेकांना लसींचा पहिला डोस मिळाला नाही तर अनेकांना १५-१५ दिवस लसींचा दुसरा डोस उशीराने मिळत आहे. त्यामुळे केंद्राच्या लस धोरणाबाबत सातत्याने टीकेच्या स्थानी राहीले आहे. यापाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी २ कोटी ३७ लाख ७३ हजार इतक्या विक्रमी नागरीकांचे लसीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.