पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे.
एक महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्यावर आघातच झाला होता. प्रत्येक लढ्यात त्यांची साथ असायची.संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. स्व. बाळासाहेब यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार, व्रतस्थ पत्रकार हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत व्रतस्थ पत्रकार हरपला आहे. सन्माननीय दिनू रणदिवे हे महाराष्ट्रातले धडाडीचे, नावाजलेले, कृतीशील पत्रकार होते. ध्येयवादी, युवा पत्रकारांचे आदर्श होते. गोवा मुक्ती लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आचार्य अत्रे व कॉम्रेड डांगे यांच्यासारख्या मान्यवरांसोबत रणदिवेसाहेबांनी कारावास भोगला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीने ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरु केले होते. दिनू रणदिवेंनी पत्रकार म्हणून कारकीर्दीची इथूनच सुरुवात केली. मुंबईतील रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गिरणगावातील कामगारांच्या लढ्याला रणदिवे साहेबांनी आपल्या लेखणीने समर्थ साथ दिली. आयुष्यभर त्यांनी कष्टकरी, वंचित, शोषित समाज घटकांच्या हितासाठी पत्रकारिता केली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार हरपला!: बाळासाहेब थोरात
ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे, दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचा सामाजिक चळवळींमध्येही सहभाग होता. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दिपस्तंभच होते. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नियतकालिकेतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली नंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी काम केले. संयुक्त महाराष्ट्र पत्रिका व लोकमित्र या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी केले. दिनू रणदिवे यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला.
व्रतस्थ पत्रकारीता करणारा पत्रकाराला मुकलो-फडणवीस
संपूर्ण आयुष्य व्रतस्थ भावनेने पत्रकारिता करणारा, सामाजिक जाणिवा जागृत ठेवून समर्पित भावनेने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला आपण आज मुकलो.त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित,गिरणी कामगार यांचे प्रश्न ऐरणीवर आणले. बांगलादेश युध्दाचे प्रत्यक्ष वार्तांकन केले. मुंबईतील दंगलीचे वार्तांकन करताना या दंगलीचे सामाजिक वास्तव त्यांनी समाजापुढे मांडले होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
Tags ajit pawar balasaheb thorat cm uddhav thackeray devendra fadnavis dinu randive is no more goa freedome movement sanyukt maharashtra
Check Also
मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही
लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …