मागील दोन आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने चांगलीच हजरी लावली. तसेच या दोन आटवड्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याचे नोंद झाली आहे. जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात ही सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेबरोबरच मुंबईचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.
गेल्यावर्षी याच कालावधीत ३९५.२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. तर यंदाच्या मागील दोन आठवड्यात ६८५.३ इतकी दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस अंबरनाथ तालुक्यात ७७१.६ मिमी इतक्या तर त्या खालोखाल ठाणे तालुक्यात ७२३.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सलग दोन आठवडे झालेल्या जोरदार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने जुलै महिन्यातील पावसाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले होते.
पावसाने देखील जोरदार हजेरी लावत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच पाणी कपातीच्या संकटाने चिंताग्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. ठाणे जिल्ह्याला जुलै महिन्याच्या सुरुवातीपासुनच भारतीय हवामान खात्यातर्फे वेळोवेळी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे तर शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. परंतु, या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे, सखल भागात पाणी साचणे, उपनगरीय रेल्वेगाड्या उशिराने धावणे यासांरख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कालपासून सततच्या पावसामुळे पालघर, उल्हास नगर येथील नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत काही नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आला आहे.
तालुका निहाय सरासरी दुपटीने झालेला पाऊस (मिमी)
ठाणे ३९१.१ ७२३.३
कल्याण ४०१.१ ७१६.३
मुरबाड ३९७.५ ४८६.४
भिवंडी ३८८.९ ७१६.८
शहापूर ३९७.२ ६९६.१
उल्हासनगर ३५६.८ ७०६.२
अंबरनाथ २७६.९ ७७१.६