Breaking News

चार तासाच्या पावसाने नागपूरचीही तुंबई: ट्विटरवरील काही व्हिडिओ रस्त्यावर साचले चार ते पाच फुट पाणी

ऐरवी मान्सूनच्या पावसाने मुंबईत पावसाच्या पाण्याने नाले तुंबून मुंबईची तुंबई होण्याचा प्रकार काही नवा नाही. मात्र नागपूर शहर राज्याची उपराजधानी म्हणून आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु या राज्याला आणि देशाला नियोजन पध्दतीने विकासाचा सल्ला देणाऱ्या या दोन मोठ्या नेत्यांच्या शहरात मात्र अवघ्या ढगफुटी सदृष्य पाऊसाने शहरातील अनेक भागात चार ते पाच फुट पाणी साचल्याचे चित्र पाह्यल्या मिळालं. तर अनेक रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्टॉलवरील माल पाण्यात वाहून जाताना दिसून आला.

नागपूरात पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. अवघ्या चार तासांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे पाह्यला मिळाले. तर पंचशील चौक परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये देखील पाणी शिरले. याशिवाय शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिटही पाण्याखाली गेले. तसेच यावेळी एका आजीबाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे.
पावसाने झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना म्हणाले, नागपूरमध्ये जवळपास ४ तासांमध्ये १०९ मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. त्यातील ९० मिलीलीटर पाऊस केवळ दोन तासात झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रचंड तीव्रता पाहायला मिळाली. यामुळे आंबाजरी तलाव भरून पाणी वाहिलं. हे अतिरिक्त पाणी नाग नदीतून वाहतं. त्यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाग नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. आंबाजरी ले आऊट, वर्मा ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरपासून पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि नंदनवनपर्यंत नाग नदीच्या दोन्ही बाजूला पाणी शिरलं. तळ मजल्यात तर पाणी शिरलंच, पण अनेकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं. नागपूरचं मुख्य बसस्थानक असलेल्या मोरभवन येथे तर बसमध्ये पाणी शिरलं. त्या ठिकाणी प्रशासन तत्काळ कार्यरत झालं. नागपूरचे महापालिका आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय टीम तेथे कार्यरत होती. तात्काळ दोन एनडीआरएफच्या टीम, दोन एसडीआरएफच्या टीम आणि दोन सैन्याच्या टीम अशा ६ टीम तैनात करण्यात आल्याचं सांगितलं.

शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत ४०० नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आहे. मात्र अद्याप बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला नाही. परंतु पाणी हळूहळू ओसरत आहे. यात दुर्दैवाने एका आजीचा मृत्यू झाला आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला असून बाधित लोकांना तात्पुरती मदत करण्याचे काम सुरु असून प्रशासन जागरूक पणे काम करत आहे, असे सांगितले.

 

Check Also

पावसासाठी नव्हे तर या कारणासाठी पुढील २४ तासांकरिता या जिल्ह्यांना येलो अलर्ट अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *