मुंबई: प्रतिनिधी
नांदेडमधील मनसैनिकाने जात आणि पैशामुळे राजकारण करू शकत नसल्याचे कारण देत आपण सोडून जात असल्याचे सांगत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर सगळ्यात मलाच जास्त त्रास होईल असे सांगत जात आणि पैशाच्या जोरावर सुरु असलेल्या राजकारणाला बाहेर काढायचंय त्यामुळेच हा संघर्ष सुरु असल्याने पुन्हा अशा पध्दतीने मला श्रध्दांजली वाहण्याची वेळ माझ्यावर आणू नका असे भावनिक आवाहन त्यांनी मनसैनिकांना आज जाहीर पत्राद्वारे केले.
जात आणि पैशात अडकलेल्या राजकारणाला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. नवनिर्माणाच्या या लढ्यात जात आणि पैश्यात अडकलेले राजकारण बदलायचंय म्हणून हा १४ वर्षे संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहोणाऱ्यांची सर्वात जास्त दमछाक होते पण माझी तयारी आहे आणि तुमचीही देखील. त्यामुळेच इतक्या चढ उतारानंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळलेली नसल्याची बाब त्यांनी कार्यकर्त्यांच्या नजरेसमोर आणत त्यांचे मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न केला.
चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही आणि उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. या चढ-उताराच्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थेतेने घेरून जात असल्याची भावनाही त्यांनी मनसैनिकांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली.