पुणे : प्रतिनिधी
भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात येवूनही या घटनेचे मास्टरमाईंड असलेल्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर जनक्षोभ आणि विरोधकांच्या रेट्यामुळे दोघांपैकी मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली. तर संभाजी भिडेवर अद्याप कोणतीही कारवाई नाही.
विशेष म्हणजे काल भीमा कोरेगांव येथील हिंसाचारप्रकरणी विधान परिषदेत चर्चा झाली. त्यावेळी या चर्चेला उत्तर देताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांचीही नावे घेण्याचे टाळले होते. मात्र विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याने अखेर एकबोटेंना अटक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मिलिंद एकबोटेला बुधवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मिलिंद एकबोटेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरूवातीला त्याला दिलासा ही दिला. मात्र नंतर दिलासा देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी अटक केली. भिडे आणि एकबोटे यांच्या अटकेसाठी विरोधकांनी मोठा दबाव सरकारवर टाकला होता तसेच या दोघांना अटक व्हावी अशी आंबेडकरी जनतेचीही मागणी होती. तब्बल दोन महिन्यांनंतर विरोधकांच्या आणि जनतेच्या मागणीला यश मिळाले आहे.