नागपुर : प्रतिनिधी
आज तिसऱ्या दिवसाचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होताच विरोधकांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. तर त्यास प्रत्युतर म्हणून सत्ताधारी सदस्यांनी जय विदर्भाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विरोधक सभापतींच्या आसनाकडे धावले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने सभापतींनी चारवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात करताच संसदीयकार्य मंत्री गिरीश बापट यांनी निवेदन केले की, आज मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचन प्रकल्प बाबत कामकाजात चर्चा आहे. त्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करता येईल. सरकारची शेतकरी व विदर्भाच्या मुद्यावर चर्चा करण्याची तयारी आहे. तर कामकाज पुढे चालू द्यावे असे विनंती सदस्यांना केली. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सभापतींनी विरोधकांना आपल्या जागेवर बसण्याच्या सूचना करीत आपणाला प्रश्नोत्तराचा तास सुरू करायचाय असे सांगायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी आणखीनच आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी बाकावरून जय विदर्भ तर विरोधकांकडून जय महाराष्ट अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यानी सभापतींच्या आसनासमोर मोकळ्या जागेत येवून घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे गोंधळ वाढत गेल्याने कामकाज चालविणे अवघड झाल्याने सभापतींनी अर्ध्या तासाकरीता कामकाज तहकूब केले.
अर्ध्या तासानंतर सभागृहाचे कामकाज उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सुरू करताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विरोधकांनी जय महाराष्ट्र तर सत्ताधाऱ्यांनी जय विदर्भ अशा घोषणाबाजी पुन्हा सुरु केली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सुनिल तटकरे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निवेदन करीत होते. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे गोंधळ वाढीस लागला. या गोंधळात कामकाज चालविणे अशक्य झाल्याने उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पुन्हा अर्धा तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.