मागील काही दिवसांपासून शिंदे गट-भाजपा आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे काही बोलणार का? अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांनी भाजपा, काँग्रेस, उध्दव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवित मला अजूनही राज्याच्या वातावरणात निवडणूका दिसत नाहीत. मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये या निवडणूका लागणार असून त्यासाठी सर्वांनी पूर्ण ताकदीनिशी आणि सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरण्याचे आदेश देत मग मुंबई महापालिका कशी जिंकून देतो बघा असे आश्वासक उद्गार काढत आगामी निवडणूकीत एकला चलो रे चे संकेत दिले.
गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित मनसेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यभरातील मनसे गटप्रमुख उपस्थित होते.
आपण केलेल्या आंदोलनानंतर काही प्रमाणात भोंगे उतरले. मात्र अजूनही काही जणांची चरबी कमी झालेली नाही. जे कोणी आजही मोठ्या आवाजात भोंगे लावत आहेत. त्या सर्वांची आधी पोलिसांमध्ये जाऊन कंप्लेंट करा आणि तो पोलिस जर कंप्लेटं घेत नसेल तर त्याच्यावर कंटेम्पट ऑफ कोर्टची केस दाखल होईल. त्यानंतर जे ऐकणारे नाहीत त्यांच्यासमोर मोठे मोठे बॉक्स लाऊन हनुमान चालिसा वाजविण्याचे आदेशही त्यांनी यावेळी मनसैनिकांना दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आतापर्यत जी आंदोलने करण्यात आली त्याचा स्ट्राईक रेट पाह्यला तर तो ८० टक्क्याहून अधिक आहे. मात्र आपली आंदोलने आणि त्याचे यश लोकांच्या विस्मृतीत जावीत यासाठी काही ठराविक यंत्रणा काम करत असल्याचा सूचक आरोपही त्यांनी केला.
महाराष्ट्रात उद्योग येतच आहेत. मात्र ज्या राज्यात उद्योग नाहीत त्या राज्यांमध्ये आधी उद्योग घेऊन जा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करत झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात आधी उद्योग न्या आणि तेथील नागरिकांना रोजगार द्या. कारण ही लोक तेथून इथे मुंबईत महाराष्ट्रात येतात. त्यामुळे तिथल्या लोकांना रोजगार द्या. पण त्या त्या राज्यात स्थानिक भूमिपूत्रांनाच रोजगार द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच येत्या १ तारखेपासून कोकणचा दौरा करत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.