पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे सुद्धा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नारायण राणेंनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदी तरुण-तरुणींना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते. त्यातील १० लाख नोकऱ्यांचा पहिला टप्पा पार केला आहे, असे नारायण राणेंनी म्हटलं.
या तरुण-तरुणींना शासनाच्या विविध विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ हजार तरुणांना नोकऱ्या देऊन चांगलं काम केलं आहे. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यांना आनंद आहे. यावरून कोणी राजकारण करत असेल, तर दिवाळीनिमित्त मी काही बोलणार नाही, असेही नारायण राणेंनी म्हणाले.
यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे. उध्दव ठाकरे गटाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी भाजपाची रणनीती काय असणार आहे? असा सवाल प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला.
त्यास उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना कुठं राहिली आहे. ५६ आमदारांतील ५ ते ६ आमदार शिवसेनेकडे राहिले आहेत. ते सुद्धा लवकरच प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्र आणि देशात बरचं काही आहे. त्यांचं राजकारण ‘मातोश्री’पुरतं चालतं. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ते माझे सहकारी होते. तेव्हा असे नव्हते, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.