मुंबई : प्रतिनिधी
महिलांविषयी अपशब्द काढणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत भाजपचा उपमहापौर छिंदम, आमदार प्रशांत परिचारक आणि राम कदम ही सगळी हीनवृत्तीची माणसे असल्याची टीकाही त्यांनी केली.
वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात आयोजित शिवसेनेच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
राम कदमला भाजपसह कोणत्याही राजकिय पक्षांनी उमेदवारी देवू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद असल्याचे जाहीर केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बेटी बचाओ-बेटी बढाओ ही योजना सुरु केली. मात्र राम कदमांच्या वक्तव्यांमुळे कदाचित भाजपने ही योजना बंद केली की काय? अशी शंका निर्माण झाली असून कदमा सारख्या वाल्याचे काय करणार असा सवालही त्यांनी यावेळी केला.
नक्षलवादच्या आरोपाखाली महाराष्ट्रातील विचारवंत आनंद तेलतुंबडे, साहित्यिक वरवर राव यांच्यासह अन्य पाचजणांवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र त्यांचा प्रत्यक्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सहभाग असेल तर त्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्याऐवजी पत्रकार परिषद घेवून त्याविषयीची वाच्यता कशाला करताय असा सवाल करत पुणे पोलिसांच्या कारवाईच्या पध्दतीवरही त्यांनी टीका केली.