आज ईडीने पहाटेपासून हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांचा मुलगा आणि मुलीच्या घरावर छापे टाकत सर्व कागदपत्रांची तपासणी सुरु केली. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे नाव घेतले. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत सोमय्या हे फक्त विशिष्ट लोकांनाच लक्ष्य करत असल्याचा सूचक आरोप केला.
कागल आणि पुण्यात काही ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली. यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ईडी कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणं झालं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवार ब्रीचकँडी रुग्णालयात आहेत. त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. मी या कारवाईबाबत त्यांच्याशी बोलू शकलेलो नाही.
किरीट सोमय्यांनी नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि अस्लम शेख यांच्यावर कारवाईची भाषा केली. त्यामुळे विशिष्ट लोकांना लक्ष्य केलं जात आहे का असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या धर्मावरून लक्ष्य केलं जात असल्याचं म्हटल्याचे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
माझ्या आणि माझ्या मुलीच्या घरावर ईडीने छापे टाकल्याची माहिती मला मिळाली आहे. मी कामानिमित्त बाहेरगावी असल्याने दुरध्वनीवरून मला ही माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी करत कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू, असे विनंती वजा आवाहनही त्यांनी केले.
दीड दोन वर्षांपूर्वीही ईडीने असाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हा सर्व माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली होती. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. आज संध्याकाळपर्यंत ईडीचा तपास पूर्ण झाल्यानंतर या तपासात काय नवीन निघालं याची माहिती मिळेल त्यानंतरच याबाबत सर्व माहिती घेतल्यानंतर सविस्तर प्रतिक्रिया देईन असेही ते म्हणाले.