शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिलीच दिवाळी होत आहे. यापार्श्वभूमीवर शंभुराज देसाई यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केले. या वेळी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही, असा संकल्पच जाहिर केला.
शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र हा उज्ज्वल महाराष्ट्र व्हावा, हा महाराष्ट्र देशात नंबर १ असावा असा आमचा प्रयत्न कायम राहणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत. मात्र उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळी दौऱ्यांवरून आमच्यावर टिका करत आहेत. त्यांनी त्यांचा २४ मिनिटांचा दुष्काळ दौरा तपासून पाहावा. नंतर आमच्याबद्दल बोलावं असा खोचक टोलाही लगावला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं. रामराजे हे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत. परंतु, तुमचं सरकार असताना लोकशाही राहिली आणि आमचं सरकार असताना ती संपली असं असू शकत नाही. रामराजेंची टीका ही उद्वेगातून आहे. खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सत्तेपासून जास्त काळ लांब राहू शकत नाही आणि यामुळे त्यांची अगापाखड होत आहे. परंतु आम्ही राष्ट्रवादीला पुढील १५ वर्ष सत्तेत येवू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
शेतक-यांना ओल्या दुष्काळामुळं मोठा फटका बसला आहे. मात्र, सरकारनं याची पाहणी करुन मदत करण्याचं धोरण हाती घेतलय. जे शेतकरी निकषात बसत नाहीत त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या बाबत विचार केला गेला असल्याची माहितीही त्यांनी दिली.