Breaking News

राहुल गांधी यांचा मोदींसह भाजपावर निशाणा; भारताचे तुकडे करताय, मणिपूरमधील आईला मारलत… अविश्वास ठरावावरून राहुल गांधी यांची मोदी यांना रावणची उपमा

मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे विरोधकांनी याप्रश्नावर चर्चेची मागणी करत सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव संसदेच्या लोकसभेत आणला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देत त्यांची रद्द केलेली खासदार की बहाल केली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदारकी परत मिळाल्यानंतर संसदेत दमदार एन्ट्री घेतली. मणिपूरच्या धगधगत्या विषयावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते मणिपूरला गेले नाहीत, पण मी तिथे गेलो. मणिपूर तोडून तुम्ही त्याचे दोन भाग केलेत, भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये राहणाऱ्या माझ्या आईची हत्या केली, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी म्हणाले, मी आज डोक्याने नाही तर मनापासून बोलणार आहे. मी आज अदानींविषयी बोलणार नाही, त्यांच्याविषयी बोललं की काही जणांना त्रास होतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी रिलॅक्स राहावं, असं म्हणत राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना हळूच चिमटा काढला.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी १०३ दिवस देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भाजपा जोडो यात्रा केली. भारत जोडो यात्रेदरम्यान दररोज भारतीयांचा ‘आवाज’ ऐकला, समाजातील सर्व घटकांचा आवाज ऐकला. भाजपाने मला दहा वर्ष शिव्या घातल्या, म्हणूनच देशाला समजून घेण्यासाठी मी भारत जोडो यात्रा केली. भारत जोडो यात्रेआधी माझ्यात अहंकार होता, मात्र नंतर तो गळून पडला.

तसेच राहुल गांधी म्हणाले, मणिपूरविषयी तुम्ही खोटं बोलता, मी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते मणिपूर हा भारताचा भाग नाही, ते तिथे गेले नाहीत, पण मी मणिपूरला गेलो. मी आता मणिपूर या शब्दाचा उच्चार केला. पण तुम्ही मणिपूर हे राज्य ठेवलंच नाही. मणिपूरचे तुम्ही दोन तुकडे केले आहेत. भारतमाता माझी आई आहे, मोदी सरकारने मणिपूरमध्ये माझ्या आईची हत्या केली. या लोकांनी फक्त मणिपूरच नाही, तर संपूर्ण देशाचा खून केला आहे, तुम्ही देशप्रेमी नाही तर देशद्रोही आहात, तुम्ही भारत मातेचे रक्षक नाही, तर हत्यारे आहात, असा हल्लाबोल मोदी सरकार आणि भाजपावर चढवला.

राहुल गांधी बोलताना म्हणाले, मला तिथे एक महिला भेटली. तिने सांगितलं की माझ्या एकुलत्या एका मुलाला मी डोळ्यादेखत गोळी लागताना पाहिलं. मी अख्खी रात्र त्याच्या मृतदेहासमोर बसून काढली. मला भीती वाटली, मी घर सोडलं, अशी कहाणी एका मणिपुरी महिलेनं सांगितल्याचं राहुल गांधी सदनात म्हणाले.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ज्या पध्दतीने रावण हा फक्त दोनच व्यक्तींचे ऐकायचा, एक म्हणजे मेघनाथ आणि दुसरा कुंभकर्ण याचे. तसेच मोदी हे अमित शाह आणि कुंभकर्ण यांचे ऐकतात अशी खोचक टीका करत पुढे बोलताना म्हणाले की, रावणाची लंका हनुमानाने जाळली नाही तर रावणाच्या अहंकारामुळे जळाली. देशात तुम्ही (भाजपाच्या खासदारांना उद्देशून) देशात दुहिचे विष विकत आहात, तुमच्यामुळे भारत दोन तुकड्यांमध्ये विभागला आहे. तुम्ही देशद्रोही आहात देशभक्त नाही आहात असा आरोपही केला.

यावेळी राहुल गांधी यांच्या भाषणा दरम्यान प्रत्येक वाक्यागणिक भाजपाचे खासदार राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात होता.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *