फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महापालिकेकडून अखेर अधिकृतपणे वगळ्यात आली आहेत. राज्य सरकारकडून याबबत अधिकृतपणे अध्यादेश काढून पुणे महापालिकेतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळण्यात आली आहेत. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची वेगळी नगरपरिषद स्थापन व्हावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. अखेर याबाबत शिंदे सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यामुळे फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावाची वेगळी नगर परिषद होणार आहे.
नवीन नगरपालिकेचं नाव फुरसुंगी उरूळी नगरपरिषद असणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यावर फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे पुणे महानगरपालिकेतून वगळल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज राज्य शासनाने अध्यादेश काढला. फुरसुंगी उरूळी देवाची नगरपरिषदेचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं सुरुवातीला पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण गावकऱ्यांनी त्याला विरोध केला. या गावांची वेगळी नगरपालिका व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती. वेगळी नगरपालिका झाल्यास गावांचा विकास चांगल्या प्रकारे होईल. नागरिकांना नागरी सुविधा पुरवण्यास मदत होईल आणि विकास होईल, अशी गावकऱ्यांची धारणा होती. त्यानुसार वेगळ्या नगरपालिकेची मागणी करण्यात येत होती.
या दरम्यान राज्यात सत्तांतर घडून आलं. या सत्तांतरानंतर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांची वेगळी नगरपरिषद असावी अशी मागणी केली. शिवतारे यांनी गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्षा हे शासकीय निवासस्थान गाठलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या नगरपरिषदेची घोषणा केली होती.