राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळावरच कायदेशीर प्रश्न उपस्थित करत चांगलेच खिंडीत गाठले आहे.
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की,
मंत्रिमंडळाच्या पूर्ण कोरमसह मंजूर झालेला आधीचा ठराव रद्द करण्याची हिंमत हे लोक कशी करू शकतात? आता त्यांनी तोच ठराव पुन्हा मंजूर केला. दोघांचंच मंत्रिमंडळ? याला कुणी मंत्रिमंडळ म्हणतात का? दोघांचं मंत्रिमंडळ जगात कुणी पाहिलंय का? १५ दिवस होत आले. या सरकारच्या मंत्रिमंडळाला कायदेशीर स्थानच नसल्याचे सांगत त्यांना माझी टीका झोंबते. पण मी शिवसेनेच्यावतीने, महाविकास आघाडीच्या वतीने बोलतोय असेही म्हणाले.
सरकारने पाकिटमारीतून बहुमत प्राप्त केलं आहे. सरळमार्गाने नाही. इतिहासात याची नोंद राहील. एक घटनाबाह्य सरकार इथे आलं. या लोकांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. भविष्यात त्यांना महाराष्ट्रासमोर या सगळ्याची उत्तरं द्यावी लागतील. आज त्यांना शिवसेना फोडल्याच्या गुदगुल्या होत आहेत. पण शिवसेना फोडणं इतकं सहज शक्य नाही. धमकी, दहशत, पैशाची आमिषं यातून हा पक्ष कधी फुटणार नाही. आम्ही सगळे उध्दव ठाकरेंच्या सोबत आहोत असेही त्यांनी सांगितले.
अत्यंत बालिश आणि बेकायदेशीर पद्धतीने राज्याचा कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी यासंदर्भातला खटला सुरू आहे. उपमुख्यमंत्री कालपर्यंत मुख्यमंत्री होते. अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नसल्याचेही त्या म्हणाले.