नंदूरबार मधील शिवसेना वाढीच्या महत्वपूर्व योगदान राहिलेल्या आमशा पाडवी आणि जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे दुर्लक्षित राहिलेले परंतु विधान परिषदेवर निवडूण आलेले आमशा पाडवी यांनी अखेर आज शिवसेना उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उपस्थित होते. तसेच नंदूरबार जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाडवी यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू गोटातील आमदार रविंद्र वायकर यांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर अनेक ठाकरे गटातील नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानंतर आज विधान परिषदेतील आमदार आमशा पाडावी यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
आमशा पाडवी यांच्या गटात स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इथे जमलेले सगळेच हे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. पण आमशा पाडवी यांनी महाविकास आघाडीला सोडून खऱ्या शिवसेनेबरोबर आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात डबल इंजिनचे सरकार आले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील देशात होत असलेल्या विकासाला पाहुन आमशी पाडवी हे आपल्या सोबत आले असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सरकारला पाठबळ दिले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. त्यामुळेच आज अनेक आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी हे खऱ्या शिवसेनेसोबत येत आहेत. पाडवी यांनी इथल्या सर्व आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणूकीत मतदान केल्याने ते निवडूण गेल्याचे सांगत त्याची आठवणही सांगितली. यावरून त्यांच्यातील कृतज्ञपणा दिसून येतो. पण कृतघ्नपणा कसा असतो त्याचे उत्तर समोरच आहे असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
तसेच शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या जाहिर सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसैनिकांच्यादृष्टीने हा काळा दिवस आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना बाजूला ठेवले, त्यांच्यासोबत कधीही न जाण्याचा दिलेला शब्द आयुष्भर पाळला. तसेच स्वातंत्र्यवारी सावरकर यांच्यावर सतत आरोप केले. आज त्याच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीथळाजवळ राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्याकडे फक्त बाळासाहेबांचे नाव आहे पण बाळासाहेबांचे खरे विचार इथे आमच्यासोबत आहेत. खरे तर बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं ठेवून माफी मागायला पाहिजे असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला.