राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या ६ जागांकरीता होणाऱ्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एक शेवटची शिष्टाई म्हणून महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सुनिल केदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरीता त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी गेले. मात्र भाजपा आणि महाविकास आघआडीच्या नेत्यांमध्ये सहाव्या जागेवरून एकमत न झाले नाही.
त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, वेळ संपलेली आहे असं म्हणण्यापेक्षा आता वेळ सुरु झालेली आहे. आता स्पष्ट चित्र झालं आहे असे सूचक वक्तव्य करत पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडीकडून प्रयत्न झाले की महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक आपण एकमेकांच्या सहमतीने लढवतो. कोणत्याही प्रकारे घोडेबाजाराला वाव राहू नये, यासाठी नेहमीच आम्ही अशा निवडणुकांमध्ये प्रयत्न केलेले आहेत. त्या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते हे आज सकाळी भाजपाच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्याचे त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि चर्चा केली. काही प्रस्तावांचं अदानप्रदान झालं. मला असं वाटतं की, पुढील तीन-चार तासांमध्ये त्या संदर्भात काही विशेष घडलं नाही. दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, भाजपा त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि शिवेसेनेचे जे दुसरे उमेदवार आहेत, संजय पवार हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे आता जी काय निवडणुकीची प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला सामोरं जाणं आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणं, ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालची जी महाविकास आघाडी आहे. या महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे की आमचा चवथा उमेदवार देखील अगदी व्यवस्थित निवडून येईल असेही ठामपणे त्यांनी यावेळी सांगितले.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मात्र, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी प्रस्ताव स्वीकारल्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता राज्यसभा निवडणूक होणार असल्याचं निश्चित झाले आहे.