शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आले. मात्र शेवटपर्यत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाईल असे वाटत असतानाच काही तास आधी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री पदावप एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली.
परंतु एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागल्याने आणि पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर येवू ठेपला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून कधी एकनाथ शिंदे यांच्यावर तर कधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला असून ओबीसी आरक्षणाचं काम एकनाथ शिंदे यांच्या आकलना पलिकडे असल्याचे म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस यांना घोड्यावरून उतरवून गाढवावर बसावावे लागेल असा खोचक टोला लगावला.
विनायक राऊत म्हणाले, ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. केंद्र सरकारने जाणूनबुजून इम्पेरिकल डेटा दिला नाही. इम्पेरिकल डेटा दिला असता तर ओबीसी आरक्षण लागू झालं असतं. पण केंद्र सरकारने दुटप्पीपणा केला. संसदीय समितीपुढे एक आणि न्यायालयात वेगळी भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाचं श्रेय शिवसेना किंवा महाविकास आघाडीला मिळू नये, म्हणून केंद्राने हा डेटा दिला नसल्याचा आरोप केला.
ओबीसी आरक्षणाचं काम एकनाथ शिंदे यांच्या आकलनापलीकडचे आहे. पण देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, की दिल्लीत तुमचं वजन असेल, तर ते वापरा आणि ओबीसीचा प्रश्न सोडवा. पण आता दिल्लीत तुमचं वजन कमी झालं आहे, हे दिसून आलं आहे. तुम्हाला अंधारात ठेवून सर्व निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तुम्हाला घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं, हे तुमचं दुर्दैवं आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यांच्या बुद्धीचातुर्याबद्दल आणि अभ्यासाबद्दल मला खूप अभिमान असल्याचेही ते म्हणाले.