शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये शहाजी पाटील हे सर्वात पुढे होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडापेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा कार्यकर्त्याबरोबरील “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होत गाजला. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण बंडखोरी केल्यानंतर मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा-मुंबई असा कसा घडला त्यामागे नेमक्या कोणत्या घडल्या याची उस्तुकता अद्यापही राज्यातील जनतेत आहे. या अनुषंगाने नेमकं काय-काय घडलं याचे अनेक किस्से शहाजीबापू पाटलांनी आज सांगत बंडामागील इन्साईड स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना शहाजी पाटील म्हणाले, व्यक्तीगत पातळीवर मला बंड फसले तर काय ? याची काहीही चिंता नव्हती. पण काही लोकांना चिंता झालीही असावी, अशी शक्यता आहे. मला याबाबत चिंता नव्हती, याचं कारण म्हणजे मी यश-अपयश खूप पचवलं आहे. त्यामुळे मला याचं फारसं कौतुक नाही. मुळात मला आजही आमदार असल्यासारखं वाटत नाही. मी तिथेही तसाच वागलो. पण जे घडत होतं, ते मी बारकाईने पाहिलं. तेव्हा मला जाणवलं येथे आलेला प्रत्येक माणूस कडवा वाटत होता. डगमगत नव्हता. आपसात गप्पा मारताना देखील आमदारकी गेली तर जाऊ दे, असा विचार ते करत होते.
ज्यावेळी आपण युद्धाला जातो, तेव्हा घरी काय चाललंय? हे बघून चालत नाही. ही लोकशाहीची लढाई आहे. त्यामुळे आपण पडलो तरी घराकडे जातोय आणि झुकलो तरी घराकडे जातोय. पण आधीच्या काळात मावळे लढाई करायला जायचे, तेव्हा त्यांना बायका ओवाळायच्या, टीळा लावायच्या. तेव्हा परत येण्याची हमी नव्हती. पण बायका म्हणायच्या मर पण पराजित होऊन येऊ नको. आम्हीही असंच गेलो. मरायचं पण हरायचं नाही, जिंकूनच यायचं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही जिंकून आल्याचे त्यांनी सांगितले.
बंडखोरी फसली तर प्लॅन बी होता का? या प्रश्नाला उत्तर देताना शहाजीबापू म्हणाले, मी काही नेता नाही, मी एक कार्यकर्ता आहे. पण ज्या गतीने हे सर्व घडत गेलं. त्यामध्ये एकनाथ शिंदें यांनी कसा गोल केला, हे कुणालाच कळलं नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.