शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादेतील पेंढापूर आणि दहेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका करत निशाणा साधला.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करताना म्हणाले, उद्धव ठाकरे आज १५ मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटतं की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होतं असेल तर यासारखं आश्चर्य नाही अशी खोचक टीका केली.
मला फक्त एकच गोष्ट खटकली. आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नसताना, त्यांना असं दौऱ्यावर बोलवायला नको होतं. त्यांना औरंगाबादमध्ये बोलावून त्रास का दिला? हा माझा प्रश्न आहे. आपल्याकडे कंत्राटावर भरती झालेले काही कार्यकर्ते आहेत, जे आजकाल भाषणं करतात. त्यांना दौरा करायला लावायला हवं. कारण त्यांनी केवळ भाषणं करायची आणि आम्ही टाळ्या वाजवायच्या, यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
नवीन कार्यकर्त्यांनाही कळू द्या, शिवसैनिकाची मेहनत काय असते? उद्धव ठाकरे ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले, याबद्दल स्वागतच आहे. पण ते येऊन लगेच ताबोडतोब निघून गेले. हे काही दिलासा देण्यासारखं नाही. असाच दिलासा त्यांनी आम्हाला दिला असता तर एवढं रामायण घडलंच नसतं असा खोचक टीकाही त्यांनी केली.