Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, राज्य- केंद्राने लवकर निर्णयाची आवश्यता, पण आता… विलासराव देशमुख यांचे मित्र विनायकराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लातूर जिल्ह्यातील भाजपाचे नेते तथा पूर्वाश्रमीचे स्व.विलासराव देशमुख यांचे घनिष्ट मित्र विनायकराव पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आज देशाच्या समोर अनेक प्रश्न उभे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या आरक्षणाच्या प्रश्न आधी देखील चर्चा झालेली आहे. मी स्वतः जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे समजून घेतलं आणि त्यातून मार्ग काय काढता येईल याचाही विचार केला. केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणाच्या विषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता होती. परंतु ती लांबणीवर गेली. त्याचा परिणाम आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनव्याच्या स्वरूपात पाहत आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आग्रही भूमिका घेत आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे देखील मराठा आरक्षण प्रश्नासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत.

शरद पवार बोलताना म्हणाले, जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जरांगेंच्या उपोषणाची दखल घेत जरांगेंच्या मागण्यांची पूर्तता झाली पाहिजे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. कुणाच्याही ताटातलं न काढता मराठ्यांना आरक्षण द्या. मी अपेक्षा करतो की आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती लवकरात लवकर नीट व्हावी अशी आशा व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये वेगळ्या लोकांची सत्ता आहे मी हे नेहमी सांगतो की सत्ता बदलत राहते. देशातील चित्र हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही. मी मागेही माझ्या सभांमध्ये सांगितलं आपण जर आपल्या देशाचं सध्याचं चित्र पाहिलं तर भाजपच्या हातात सत्ता असली तरी प्रत्येक प्रांताची परिस्थिती वेगवेगळी आहे. देशात केरळ,कर्नाटक, तामिळनाडू , आंध्र प्रदेश, तेलंगणा, या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही आणि महाराष्ट्रात देखील भाजपा सत्तेत नव्हतं पण खोके देऊन लोकं फोडण्यात आले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, अनेक राज्य अशी आहेत की ज्यांनी भाजपच्या हातातून सत्ता घेतली आहे. देशाच्या जनतेला बदल हवा आहे, त्यामुळे ते भाजपला संधी देत नसल्याचं सांगत आणि जनतेच्या प्रश्नांची पूर्तता करायची असेल तर योग्य त्या साथीदाराची गरज असते. त्याची सुरुवात आज विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून केली. त्यामुळे आपल्या सर्वांना बदल घडवायचा आहे, हा बदल फक्त सत्ता मिळवण्यासाठी नसून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बदल घडवायचा आहे. आणि हा बदल घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणजेच संपूर्ण महाविकास आघाडी आपण सगळे मिळून महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करू आपण सगळे मिळून लढल्यावर राज्याचं परिवर्तन जनतेचे प्रश्न हे लवकरच मार्गी लागणार असल्याचं म्हणाले.

शरद पवार म्हणाले, १९८० साली निवडणुका झाल्या आणि त्यावेळी माझे ५९ आमदार निवडून आले होते. त्यानंतर काही कामानिमित्त मला परदेश दौऱ्यावर जावे लागले आणि परत आल्यावर असं पाहिलं ५९ आमदारांमधून पाच आमदार राहिले आणि बाकी सगळे बंड करून निघून गेलेले होते. पुन्हा निवडणुकीच्या वेळी जे सोडून गेले होते, त्यातून दोन सोडले तर सगळ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हा जनतेने सर्वांना धडा शिकवल्याचे सांगितले.

यावेळी शरद पवार बोलताना म्हणाले की, विनायकराव पाटील व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. विनायकराव यांनी गेल्या अनेक वर्ष लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेची सेवा केली आहे आणि करत राहणार आहेत. विनायकराव पाटील यांनी अधिक जोमाने काम करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगितले.

विनायक पाटील सर्व सामान्य जनतेशी नाळ जुळलेला नेता- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की, विनायकराव पाटील कुठल्याही पक्षात असले तरी ते आमचेच असल्याचं आम्हाला नेहमी भासत आले आहे. अनेक चर्चान नंतर विनायकराव पाटील आपल्या सर्वांच्यात सहभागी झाले मी त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो लातूर जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे. लातूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, स्वर्गीय निलंगेकर साहेब ,माननीय शिवराज पाटील या सगळ्यांनी पुरोगामी बाजू लावून धरली आणि पुरोगामी तत्वांचा राजकारण त्या सर्वांनी आयुष्यभर केले. लातूरची मानसिकता काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज विनायकराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले याचा मला मनापासून आनंद आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की , विनायकराव पाटील २०१४ ला जेव्हा निवडून आले त्यावेळी मी त्यांच्या मागे लागून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये येण्यासाठी हट्ट करत होतो. परंतु त्यांच्या मनात काय सुरू होतं याचा पत्ता मला लागला नाही. पण ते आले याचा मला खूप आनंद होत असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. गेल्या दीड वर्षात जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची माती झाली असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सोनेरी झालर होती. महाराष्ट्राच्या राजकारणाला दगा देण्याची सवय नव्हती असं परंतु हे सर्व काम भाजपने डाव आखून केल्याचं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *