Breaking News

पवारांनी कानपिचक्या देत केंद्राच्या कृषी धोरणाबाबत म्हणाले… आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दरम्यान एकमेंकाना “पाठीत खंजीर खुपसला”, “कोथळा बाहेर काढणारे” अशा शब्दांचा वापर सुरु झाल्या आहेत. त्यातच काल जुन्नर मध्ये संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर टोकाची टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्दैवाने आज संघर्ष दिसत आहे. एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय. मग वक्तव्य मागे घ्यावे लागतायेत त्यांच्यावर दिलगिरी ही व्यक्त करण्याची वेळ येते अशा कानपिचक्या राजकिय नेत्यांना देत महाराष्ट्रातील ही आजची परिस्थिती असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत स्व. किसनराव बाणखेले विरोधात असताना देखील जे वागायचे, त्याची कमतरता दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्याकडे १० वर्ष कृषी खाते होतं. माझं लक्ष असल्यानं एक गोष्ट कटाक्षाने पाळली. शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत दिली तर हाच शेतकऱ्याचा आर्थिक कणा सुधारेल म्हणून माझ्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खाली येऊ दिले नसल्याचे सांगत केंद्राच्या विद्यमान कृषीधोरणावर अप्रत्यक्ष टीका करत पण सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागले आणि साखरेचे भाव वाढत आहेत, अशीच परिस्थिती राहिली. तर उसाला दर जादा देता येईल, यासाठी लक्ष देण्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी केंद्राला लगावला.

मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील सह अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते.

शिवसेना नेते संजय राऊत आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार आले. मुख्यमंत्री स्वतः व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार होते. पण त्यांना बैठक लागली. त्यांनी खासदार राऊतांकडे निरोप दिलेला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी दिली.

खासदार संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटलांवर शेलक्या शब्दात समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी भाषण सुरू केले असता प्रमुख मान्यवरांची नावे घेत असताना खेड विधानसभा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा नाव घेताच उपस्थिता मध्ये एकच हशा पिकला.

मात्र पवारांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीतच मर्यादा ओलांडत असल्याचे वक्तव्य करत कानपिचक्या राजकिय नेत्यांना दिल्याने पवारांनी दिलेल्या कानपिचक्या शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना तर दिल्या तर नाहीत ना? अशी चर्चा स्थानिकांबरोबर राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. परंतु, पवारांच्या या वक्तव्याची दखल राऊत किती घेतात याचे उत्तर आगामी काळातच मिळणार आहे.

दरम्यान मंचर आणि जुन्नर मध्ये आयोजित कार्यक्रमात कोरोना नियमांचा पार बोजवारा उडाल्याचे दिसून येत असल्याने या भागात पुन्हा कोरोनाची लाट आली तर त्यास कोण जबाबदार असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *