अचलपूर : प्रतिनिधी
एकाबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारंना परावनगी दिली. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे साऱ्या पालकांचे लक्ष लागून राहीले. अखेर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचं लक्ष लागलं होतं.
दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद होती. आता राज्य अनलॉक
करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील शाळा सुरु करण्यापूर्वी सरकारच्यावतीने एक धोरण आखण्यात येणार आहे. या धोरणामुळे विद्यार्थांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याची काळजी घेतली जाणार आहे. एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर त्या शिक्षकाच्या ऐवजी दूसऱ्या शिक्षकाला तिथे घेता येईल का ? तसेच काही कालावधीनंतर नियमीत विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात येऊ शकते का?असाही विचार सुरू असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.