राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी औरंगाबादचा दौरा करत तेथील शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांची मदत करा अशी मागणीही त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजपाबरोबर शिंदे गटाकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यातच आज दिवाळी पहाट या आयोजित कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हीही तीन महिन्यापूर्वी लढाई सुरु केली होती. ती जिंकलो असे वक्तव्य करत काल रविवारी झालेल्या भारत-पाक सामन्याशी तुलना केली. यावरून अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार करत भाजपा-शिंदे गटाला चांगलेच प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना अरविंद सावंत म्हणाले, कालच्या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू मैदानात राहुनच खेळले. त्यांनी पराभवही स्विकारला. पण तुम्ही तर ४० जण पळून गेलात. आणि पळून जाऊन विजय मिळवलात कसे काय म्हणू शकता. उगाच तुलना करू नका असा खोचक टोला लगावला.
गोरगरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का? असा सवाल सावंत शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले मागील अडीच वर्षे कशात गेली हे सर्वांनाच माहिती आहे. आमचे सरकार आले आणि हिंदुंच्या सणावरचे विघ्न गेले, असे ते म्हणत आहेत. त्यांना जनाची नाही, तर मनाची लाज वाटली पाहिजे. ते खोटे बोलत आहेत. गोरगरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का. धर्माधिष्ठीत राजकारण करायला तुम्हाला बराच वेळ मिळतो. ते सातत्याने खोटं बोलत आहेत, असेही ते म्हणाले.
एक नेतृत्व (उद्धव ठाकरे) घरातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांच्याोसबत मी होतो. ते शेतातील पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करत होते. ते गेले याला महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घातली. ते (सत्ताधारी) मात्र वातानुकूलीत घरात बसून टीका करत आहेत, असा टोलाही लगावला.
तसेच आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून चार वस्तू १०० रुपयांत दिल्या जात आहेत. मात्र लोकांना प्रत्यक्षात त्या मिळाल्या का? असा परखड सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.
उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून राजकारण पेटले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आसुडाचा योग्य वापर करावा. सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढून शेतकऱ्यांनी त्यांचे हक्क घ्यावेत. शेतकऱ्यांनी हताश न होता लढावे, असे उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यादम्यान म्हणाले होते. तर त्यांच्या याच दौऱ्याबद्दल बोलताना शिंदे गटातील नेते उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे, असे सत्तार म्हणाले होते.