मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे आज मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्याने मुख्य सचिव पदाचा पदभार अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपुर्द करण्यात आला. तसेच कोरोना काळात आणि त्यांची प्रदीर्घ प्रशासकिय सेवेतील अनुभव पाहून राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रधान सल्लागार पदी राज्य सरकारने नियुक्ती केली.
विशेष म्हणजे कुंटे यांनी पदभार सोडल्याबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सचिवालयाकडून यासंदर्भात तातडीने प्रसिध्दी पत्रक जारी करत ही माहिती दिली.
कोरोनाकाळामुळे राज्यासाठी फारसे काम करता आले नसल्याने सीताराम कुंटे यांनी मुख्य सचिव पदावरील सेवा काळास मुदतवाढ मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. तसेच मुदतवाढीसाठी दिल्लीतही प्रयत्न केले. तर भाजपामधील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा मध्यंतरीच्या काळात सुरु होती. मात्र त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. मात्र त्यांच्या शासकिय सेवेतील प्रदिर्घ सेवेचा अनुभव लक्षात घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना आपल्या सल्लागार पदी नियुक्ती केले.
यापूर्वीचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना कोरोना काळात दोन वेळा मुख्य सचिव पदावर काम करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार पदीही नियुक्ती देण्यात आली. या पदावर जवळपास दिड ते दोन वर्षे काम केल्यानंतर त्यांना रेराच्या प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले. मात्र तरीही त्याच्याकडे काही काळ मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागार पदाची अतिरिक्त धुरा होती.
अप्पर मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती आयएएस अधिकारी असून त्यांची बहुतांश सेवा गृहनिर्माण विभाग आणि संबधित संस्थामध्ये बरीच झाली आहे. यापूर्वी ते म्हाडाचे उपाध्यक्ष म्हणून नंतर गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव त्यानंतर पुन्हा शिवशाही पुर्नवसन प्रकल्पाचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांच्या वित्त व नियोजन विभागाचा विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदाचा कार्यभार आहे. या पदाबरोबरच त्यांच्याकडे आता राज्याच्या मुख्य सचिव पदाची अतिरिक्त धुरा सोपविण्यात आली आहे.