मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेले बंड काही केल्या क्षमत नसल्याचे स्पष्ट झाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३५ हून अधिक आमदार मागील तीन ते चार दिवसांपासून गुवाहाटीमधील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र आमदारांचा आणि हॉटेलचा खर्चावरून विविध तर्क लढविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर यावर दिपक केसरकर यांनी माहिती दिली असून हा खर्च आमदारच स्वत:हून करत असल्याचे सांगत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दिपक केसरकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू मांडण्यासाठी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदारांना चांगला पगार आहे. ते त्यांचा हॉटेलमधील खर्च उचलू शकतात. एकनाथ शिंदे आम्हाला इथं घेऊन आले आहेत. त्यांना त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. तो खर्च आम्ही करू. यामागे भाजपा नक्कीच नाही. आम्ही भाजपाशी बोलतोय, पण त्यामध्ये खर्चाचा काही भाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आवश्यकता असेल तर आम्ही परेड करू. आम्ही ते व्हिडीओ काढलेले आहेत. आता सगळं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सुरू आहे. कोरोनात कसं सगळं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सुरू होतं, मग आतापण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर काम करावं. त्यात काय अडचण आहे? असा उपरोधिक सवालही त्यांनी नाव न घेता ठाकरे सरकारला केला. आम्ही उध्दव ठाकरे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत राहू नये असं अनेक वेळा सुचवलं होतं. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे, असंही लक्षात आणून दिलं. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. एवढे लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेला बाकी कोणीही हायजॅक केलेलं नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच आम्हाला हायजॅक केलं होतं. त्यातून आम्ही बाहेर पडत आहोत. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. ते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. अजूनही आम्हाला त्यांच्यावर विश्वास असल्याचे ते म्हणाले.