मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला आणि गाड्या जाळण्यामागे मराठा आंदोलक नसून यात राजकीय विरोधक तसेच अवैध धंदे करणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप अजित पवार गटाचे आमदार सोळंके यांनी आज येथे केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिका केवळ बघ्याची होती अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली .
आमदार प्रकाश सोळंके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
प्रकाश सोळंके म्हणाले, ३० ऑक्टोबर रोजी मी एकटा घरात असताना बाहेर ४ ते ५ हजार मराठा आंदोलकांचे आंदोलन सुरु होते. यावेळी ते आपल्याला भेटायला येणार होते याची पूर्वकल्पना त्यांनी आपल्याला दिली होती व आपलीही त्यांच्यासोबत चर्चा करण्याची तयारी होती. मात्र शांततेत येत असलेल्या या आंदोलकांमध्ये २०० ते २५० लोक हे आपल्या राजकीय विरोधकांचे समर्थक होते, त्यात काही शिक्षक तसेच चरस ,गांजा आणि दारूविक्री करणारे लोक होते, त्यांच्या हातात तलवारी, कु-हाडी, पेट्रोल बॉम्ब आदी शस्त्रे होती असा दावा केला.
पुढे बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले, यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची भूमिका बघ्याची होती, सदर प्रसंगी अश्रूधूर पाणी फेक, लाठीचार्ज आदी पर्याय असताना पोलिसांनी यापैकी काहीही केले नाही असा आरोप करत आंतरवली सराटी येथील प्रकारानंतर सरकारने पोलिसांवर कारवाई केली. त्यामुळेच या पोलीसांनी यावेळी काही कारवाई केली नसल्याचा आरोप केला. राज्याच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे मनोधर्य खच्ची होऊ न देता त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे रहावे असे असे आवाहन करत उद्या होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत आपण हि भूमिका मांडणार असल्याचेही स्पष्ट केले.
२१ पैकी आठ आरोपी गैर मराठा
आपल्या राजकीय विरोधकांच्या समर्थकांनी बंगल्यातील ३ गाड्या, ऑफिस, घर, पोलीस आणि भेटावयास आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्याही जाळल्या किमान तीन कोटी रुपयांच्या मालमत्तेचे त्यांनी नुकसान के असून यात मराठा आंदोलक हे कृत्य करण्यापासून रोखत होते असे सांगून या प्रकरणात मराठा आंदोलकांचा हात नाही सोळंके यांनी सदर प्रकरणात पोलिसांनी २१ लोकांना अटक केली असून त्यापैकी आठ लोक हे गैरमराठा समाजाचे आहेत असा दावाही प्रकाश सोळंके यांनी केला.