स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर या सरकारला आणि भाजपाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील. नाहीतर लोकशाहीची हुकूमशाही कधी होईल, हे सुध्दा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
भाजपचा समाचार घेताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की, पाहिजे तेवढे पैसे भाजपाला द्या, पण मतदान देवू नका. देशाचा पंतप्रधान हा हप्ताबहादुर आहे. आरएसएसवाल्यांनो, तुम्ही याचा प्रचार करणार आहात काय ? ते मला सांगा. इथला टीव्ही मीडिया या गोष्टी बोलत नाही, पण देशाच्या बाहेर चर्चा सुरू आहे की, भारताचा पंतप्रधान हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे. सनातनवाल्यांना विचारतो की, असा वसुलीखोर तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहिजे का ? असा खोचक सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एका बाजूने चीन छाताडावर बसलाय दुसऱ्या बाजूने पाकिस्तान आहे. दर एक ते दोन दिवसात एक जवान काश्मीर खोऱ्यात शहिद होतो. पण तुम्ही कधी एक बातमी ऐकलीय का की, पाकिस्तानचा एक जवान मागच्या सहा महिन्यांत शहिद झाला आहे. ५६ इंचाची छाती आता १४ इंचाची झाली आहे हे लक्षात घ्या. तो आदेश देऊ शकत नाही. मोदी आणि भाजपा १५० जागा जिंकू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे असा दावाही यावेळी केला.
ते कधीही भाजपासोबत जातील…
शिवसेना (ठाकरे गट) यांना आम्ही जेव्हा म्हटलं की, आपण धर्मनिरपेक्ष मतं घेत आहोत, त्यांना आपण लिहून देऊ की, ५ वर्षे आपण भाजपासोबत जाणार नाही, तर ते ताडकन उठले आणि म्हणाले की, आम्ही लिहून देणार नाही. यांचा भाजपासोबत जाण्याचा विचार आहे हे लक्षात घ्या आणि आम्ही यांच्या सोबत युती करायची. जे धर्मनिरपेक्ष मतं घेतील आणि भाजपासोबत जातील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उबाठा गटाबाबत केला.