एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे असे सांगतानाच पंतप्रधान हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले आहेत का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीत काही प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील शिर्डी दौऱ्यावर होते. या दौऱ्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ग्रामपंचायत सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार? एखाद्या गावात कुठेही काहीही झाले तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच मोदींनाही वाटू लागले आहे अशी टीकाही केली.
पंतप्रधान ओबीसी नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी असल्याचा जो प्रचार करीत आहेत. तो खोटा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्हीही खोटारडे असून ते लेकात लेक आणि बापात बाप ठेवणार नाहीत अशी टीका केली.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुस्लिम किंवा ख्रिश्चन बांधवांनी देश सोडला असता तर एकवेळ मी समजू शकतो. मात्र भाजपाच्या राज्यात हिंदू देश सोडून जात आहेत. भाजपा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेतो. मात्र त्यांच्याच कार्यकाळात मागील एक वर्षात जवळपास १ लाख १३ हजार हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारले आहे असा आरोप केला.