काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार ६ जूनला कोसळणार असल्याचा अल्टीमेटम दिला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेत, मंत्री नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात, आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपाच्या या दोन्ही नेत्यांची चांगलीच खिल्ली उडविली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांवर उत्तर दिली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान आदींची उपस्थिती होती.
महाविकास आघाडी सरकारचा ६ जून हा शेवटचा दिवस असणार आहे असं केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी वक्तव्य केल्याबाबत शरद पवारांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो असे सांगत त्या नेत्यांना टोला लगावला.
आघाडी सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, त्याबद्दल काहीच अडचण नाही आम्ही एकत्र सरकार चालवतो आहोत. व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे निश्चितच समाधानी आहे. या सरकारला आणखी पाच वर्षे मिळायला काही हरकत नाही, ही पाच वर्षे देखील सरकार राहील आणि यानंतर देखील राहीलच असा विश्वासही व्यक्त केला.
बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, माझ्या वाचनात आलं आहे. हे केव्हाही चिंताजनकच आहे. यंदाच्या वर्षी विशेषत: जालना जिल्ह्यात आणि बीडच्या काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा परिसरात अतिरिक्त ऊस आहे. राज्य सरकार ज्याप्रकारे सगळ्या साखर कारखान्यांना सूचना देत आहे, की कारखाने बंद करू नका गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल याची काळजी घ्या. हे काम सरकारकडून सुरू असल्याचेही सांगितले.