शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशीं बोलताना चांगलेच भडकले. तसेच आता काय लिहून देवू ? असा सवाल करत सरकार अद्याप अल्पमतात नसल्याचे स्पष्ट केले.
यशवंतराव चव्हाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ही उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे. ज्या आमदारांनी बंड केलं ते आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे अजून तरी सरकार अल्पमतात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात चांगली कामे केली आहेत. कोविडच्या काळात त्यांनी परिस्थिती चांगली हाताळली. मागील अडीच वर्षांपासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आहेत. सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत आहेत. वेगवेगळ्या राज्यांची मुख्यमंत्र्यांची यादी जायची तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिसरा, चौथा, पाचवा असा क्रमांक यायचा. ते क्रमांक आम्ही देत नव्हतो. कोरोनाच्या काळात जे कार्यक्रम घेतले गेले ते त्यांच्या नेतृत्वाखाली घेतले गेले. राज्याला पुढे नेण्याचे काम त्यांनी केले याविषयी ते मार्गदर्शन करतात, असेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळाचे निर्णय घेण्याचे अधिकार हे विधानसभा उपाध्यक्ष यांना आहे. तसेच, बंडखोरी हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. बंड केलेले आमदार माझ्या पक्षातील नाहीत त्यामुळे त्यांना सल्ला किंवा त्यावर भाष्य करण्याचा अधिकार मला नाही. जे आमदार तिकडे गेले आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. ज्यांना कुणाला काही वाटत असेल त्यांनी इथे यावे आणि सांगावे. जनतेने त्यांना निवडून दिले आहे. त्यामुळे आपले आमदार कुठे गेले? देवदर्शनाला, आराम करायला, फिरायला, कशाला गेले? हे जनता विचारेल, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना अजितला बाहेरच्या राज्यातील लोकांची ओळख नाही. ती मला आहे. त्यामुळे या बंडामागे कोण आहे हे सांगायला नको, असे सांगितले होते. त्यावर शरद पवार आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. त्यांनी एकदा प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर बोलण्याची माझी लायकी नसल्याचेही ते म्हणाले.