मुंबई: प्रतिनिधी
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील, परंतु ज्यांना राज्य सरकार हे जाणूनबुजून करतंय असं वाटतंय त्यांनी विविध हायकोर्टाचे आदेश आलेत त्याचा अभ्यास करावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.
राज्यात काही महानगरपालिकांच्या मुदत संपल्यावर कोरोनामुळे निवडणूका घेता आल्या नाहीत तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना असताना नेमणूकांबाबत हे सरकार जाणूनबुजून कुठेही प्रशासक नेमण्याच्या मनस्थितीत नाही त्यांनी स्पष्ट करत जेव्हा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर विविध न्यायालयाने राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचे काम केले. मुळात याप्रकरणी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले पाहिजे होते असेही ते म्हणाले.
सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था चालल्या पाहिजे यामध्ये रस नाही. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकांनी कामकाज केले पाहिजे, परंतु कोरोनामुळे ही परिस्थिती आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही – नवाब मलिक
गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका थोडे दिवस थांबा असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये धरला आणि तशा सूचना तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांना केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची बैठक बुधवारी ;शरद पवार घेणार मतदारसंघाचा आढावा
२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढून विजयी झालेले व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक बुधवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याचे सांगत ही बैठक शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र पवारसाहेबांच्या तब्येतीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता ही बैठक आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
