राज्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून माझ्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण मी माझ्या वाड-वडिलांपासून सांगत आलोय की आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेले आहे. पण भाजपाने एकदा जाहिर करावं कि त्याचं हिंदूत्व हे नेमकं कशाचं हिंदूत्व आहे ते कदाचीत त्याचं हिंदूत्व हे गोमूत्रधारी हिंदूत्व असावं म्हणून ते तसेच बोलत असावेत. पण मी म्हणतो त्यांनी जर ते प्राशन केलं तर किमान शुध्द तरी व्हाल असा खोचक टोला लगावत महाविकास आघाडीची छत्रपती संभाजी नगर येथे पहिली सभा झाली. त्यानंतर काही जणांनी म्हणे तेथे गोमत्र शिंपडले मग तेथे आलेली माणसे आणि इथेही आलेले मुस्लिम आणि काँग्रेसमध्ये कोणी हिंदू नाही का ती माणसे नाहीत का असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. तसेच पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, हे असले हिंदूत्व संघाला मान्य आहे का, तसेच ज्या स्त्रीने माफी मागितली असतानाही तिला मारहाण केली जाते आणि पुन्हा तिला अटक करण्यासाठी पोलिसही हजर असतात मग असा हिंदूत्ववादी कारभार संघाला चालतो का असा खोचक सवालही केला.
यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, अवकाळी पावसाने आणि गारपीठीमुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना हे दौऱ्यावर जातायत आणि सांगातात आम्ही खरे रामभक्त म्हणून. हे जर खरेच रामभक्त असते तर सूरतला जाण्याऐवजी हे सर्वात आधी अयोध्येला गेले असते असा उपरोधिक टोला लगावला. त्याचबरोबर राज्यात उलट्या पायाचे सरकार आल्यानेच दर एक दोन, दोन दिवसाआड गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडत असल्याची टीकाही केली.
यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हणाले, काही जण मध्यंतरी म्हणाले की अयोध्येत बाबरी पाडण्यासाठी एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तर तेथे गेलेच नाहीत असे वक्तव्य केले. मग त्यावेळी काय तुमचे काका शिवसैनिकांना घेऊन गेले होते असा उपरोधिक टोलाही लगावला.
तसेच आताचे उपमुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते. मात्र ते कधी अयोध्येला गेले का, असा सवाल करत आताचे मुख्यमंत्री अयोध्येला जाताच मेरे कमीजसे तेरी कमीज कैसे हिंदूत्ववादी असे विचारत ते ही ऐनवेळी अयोध्येत गेले अशी टीकाही उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत अमित शाहांवर हल्लाबोल केला आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला तरी, सच्चा समाजसेवकासमोर झुकावंच लागते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
नागपुरात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. “आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार देणारे देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोंबलत आहे. मात्र, त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घरण्याच्यासमोर झुकावं लागलं. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक असल्यावर झुकावंच लागेल. हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिलं आहे.
धर्माधिकारी घराण्याची एक परंपरा असून, ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारू आणि अंमली पदार्थाचे व्यसन वाईट असते. तसेच, सत्तेची नशा सुद्धा असते. दारूचे व्यसन एक घर उद्ध्वस्त करते. तर, सत्तेची नशा पूर्ण देश उद्ध्वस्त करते, हे आपण भोगत आहोत, असं टीकास्र उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केलं आहे.
आपल्या देशात लोकशाहीचा उपयोग फक्त सत्तेत बसलेल्यांच्या मित्रांचे गिऱ्हाईक आणि मतदार वाढवण्यासाठी केला जातोय. जगाच्या श्रीमंतीत यांच्या मित्रांचे क्रमांक वाढत चालले आहेत. पण, गोरगरीब जनतेचा क्रमांक खाली चालला आहे, असा घणाघाती उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर केला.
आज दर्शन कॉलनी मैदान, नागपूर येथे 'मविआ'ची 'वज्रमूठ' सभा पार पडली. या सभेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी जनतेसोबत संवाद साधत 'वज्रमूठ' एकजुटीने बांधून, ताकदीने लढण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/0RRPVrrmJt
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 16, 2023