मागील काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणीस सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत पुन्हा जाणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरु आहेत. नेमके महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांची भेट झाल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे. या सगळ्या घडामोडींवर नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा झाली. या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारत जर विश्वगुरू होणार असेल तर आमचा पाठिंबा असेल वक्तव्य केल्याने व्यासपीठावरच खसखस पिकली अनं अजित पवार यांनी व्यासपीठावरच डोक्याला हात लावल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
नागपूरातील वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यसभेला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नेते पृथ्वीराज चव्हाण आदींनी भाषणे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाषणास सुरुवात केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उध्दव ठाकरे हे नेहमी म्हणतात त्यांना सोडून गेलेल्यांना गद्दार असे संबोधतात पण यु ही कोई छोडके कोई जाता नही, कुछ तो मजबुरी होती होंगी वरना कोई यु ही बेवफा नही करता असा शेर ऐकवत त्यांचीही कोणती तरी मजबुरी असेल असे सांगत हळूच उध्दव ठाकरे यांना चिमटा घेतला.
त्यावेळी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या शेजारी बसलेले अजित पवार गालातल्या गालात हसायला लागले.
त्यानंतर देशातील अर्थव्यवस्था आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वगुरु संकल्पेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, जर त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जर विश्वगुरू होणार असेल तर आमचा पाठिंबा असेल असे वक्तव्य करताच शेजारीच बसलेल्या अजित पवार यांच्याकडे पाहून काही तरी बोलले, त्यावेळी अजित पवारांनी कपाळाच हात लावल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
त्यानंतर स्वतःला सावरत, जयंत पाटील म्हणाले, त्यांनी घोषणा केलीय भारत विश्वगुरु होणार आहे. मात्र जागतिक क्रमवारीच्या यादीत भारताचे स्थान सातत्याने घसरताना दिसत आहे. त्यामुळे किमान घसरणीला लागलेला क्रमांक जर वाढता अर्थात वरच्या बाजूला येताना दिसला असता तर आम्ही नक्कीच त्यांना पाठिंबा दिला असता असे सांगायला विसरले नाहीत.
दरम्यान जयंत पाटील यांच्या वक्तव्याने जो संदेश जायचा होता तो संदेश गेलेला होता.