Breaking News

जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेणार

नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. मोठ्या महानगरपालिकेमध्ये शव वाहिका उपलब्ध आहेत. नगरपालिकामध्ये शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. तसेच जिल्हा रुग्णालय व नगरपालिकांना शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी नगरविकास विभागाला विनंती करु, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सांगितले

याबाबत सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना टोपे बोलत होते.

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील पायरवाडीतील पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षीय बालकाला मोखाडा येथून जव्हार कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान बालकाचा मृत्यु झाला. संबंधित मुलाचा मृतदेह दुचाकीवर स्वत:च्या घरी नेण्यात आला. ही गंभीर बाब आहे. वाहनचालक उशिरा आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिचारक व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणाबाबत अधिक खातरजमा करुन चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी २०० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम चालू असून यासाठी लागणारा निधी प्राधान्याने देण्यात येईल व हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रसुतीसाठी जाणाऱ्या महिलांना कुठलाही मोबदला न घेता मोफत सोनोग्राफी केली जाईल. नगरपालिकेने शव वाहिका उपलब्ध करुन देणे हा त्यांचा जबाबदारीचा विषय आहे. आमदारांना आपल्या मतदारसंघात शव वाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिकेत शव वाहिका असली पाहिजे. याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील रिक्त जागांपैकी अ आणि ब वर्गाची पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. क आणि ड पद भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. पी.जी. डॉक्टरांच्या ग्रामीण भागात सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग लवकरच समन्वयाने निर्णय घेईल.

जुन्या रुग्णवाहिकांना शववाहिकेत परिवर्तीत करण्याचे विचाराधीन आहे. तसेच पालघर जिल्ह्यासाठी किती शववाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या, आरोग्य विषयक प्रलंबित बाबी राहिल्या असल्यास या प्रक्रियेला जलदगती देण्यासाठी पालघर जिल्ह्याचा आढावा घेण्यात यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. या लक्षवेधीमध्ये विलास पोतनीस, रविंद्र फाटक, मनिषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *