हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमित शाह आले पण शेतक-यांना मदतीबाबत शब्दही नाही सहकार क्षेत्रावर कब्जा मिळवण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना

महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात असेलेल्या शेतकरी प्रश्नावर अमित शाह एक शब्दही बोलले नाहीत व राज्याचे नेतृत्व करणारेही मूग गिळून गप्प बसले हा महाराष्ट्राच्या शेतक-यांचं घोर अपमान असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

नाग लोक कामठी येथील काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या सांगता कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील अतिवृष्टीने शेतक-याचे होते नव्हते, असे सर्व वाहून गेले आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप कवडीचीही मदत केली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगरच्या दौ-.यावर आले पण त्यांनी शेतक-यांना मदत देण्याबाबत एक शब्दही काढला नाही. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून त्यांनी शेतक-यांनाच वा-यावर सोडले आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीने द्यावी, रब्बी हंगामासाठी बियाणे खते मोफत द्यावे व शेतकरी कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत. पण राज्याचे मुख्यंमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समोर तोंडही उघडले नाही, हा शेतक-यांचा घोर अपमान आहे. शेतकरी मरत असतानाही भाजपा सरकार मदत करत नाही. हे अंत्यत दुर्दैवी आहे. तातडीने मदत जाहीर करावी याचा पुनरुच्चार केला.

आजचे शहरी राजकारण या विषयांवरील काँग्रेस पक्षाची दोन दिवसीय कार्यशाळा, नागपूर येथे संपन्न झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार , माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.

काँग्रेस पक्षाचे शिबीर संपन्न

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नागलोक कामठी, नागपूर येथे “आजचे शहरी राजकारण” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध शहरांतील माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, शहराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक तसेच निवडक प्रदेश पदाधिकारी सहभागी झाले होते.

कार्यशाळेचे उद्‌घाटन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्यांनी आगामी काळात शहरांमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे पक्षाचे ठाम धोरण स्पष्ट केले. सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा मूलमंत्र असून, त्यातूनच पक्षाला बळकटी मिळेल असे त्यांनी अधोरेखित केले.
माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी नागरिकांच्या दैनंदिन अडचणी (वीजबिले, इन्शुरन्स इ.) सोडवण्यासाठी कार्यक्षम उपाययोजना कशा राबवता येतील यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण विभाग प्रमुख आशुतोष शिर्के यांनी “आजचे बदलते राजकारण” या विषयावर चर्चात्मक सत्र घेतले. राजू भिसे यांनी घरपट्ट्याच्या चळवळीबद्दल महत्त्वपूर्ण संवाद साधला. शहरी भागातील काँग्रेसची उभारणी व जनसंपर्कासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करणे त्यामध्ये सोसायटी सोसायटी पर्यत पोहोचणे, सर्व सण वारांचे निमंत्रण पोहोचविणे अशी यंत्रणा उभी करावी लागेल. मतदारांशी नियमित संवाद ठेवण्यावर भर द्यावा लागेल. असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी आवाहन केले.

माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा काँग्रेस मध्ये भव्य पक्ष प्रवेश

वरोरा (जिल्हा चंद्रपूर) नगर परिषदेचे चे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी आपल्या समर्थकांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी २१००० पेक्षा जास्त मते घेऊन त्यांनी आपल्या जनाधाराची चुणूक दाखवली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन चंद्रपूर लोकसभेच्या सक्रिय व धाडसी खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वात अहेतेशाम अली यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकशाही वाचविण्याच्या या लढाईत सहभागी होण्याचा निर्णय घेऊन नागपूर प्रेस क्लब येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तूळश्रीराम श्रीरामे, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशाने वरोरा-भद्रावती सह चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला फायदा होणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात अधिक बळकट होणार असल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी नागपूर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरीज बेग मिर्झा, सुरेश भोयर, राजाभाऊ तिडके यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

About Editor

Check Also

चंद्रकांत पाटील यांची माहिती, उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालय आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *