राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. तसेच महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी नवा कायदा करावा अशी मागणी सर्वपक्षियांनी केली. नेमके त्याच अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून हिवाळी अधिवेशनानंतर भाजपा आमदार आणि पक्ष कार्यकर्त्यांकडून टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणी भाष्य केले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सिल्लोडमधील कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, सर्वांनी माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजं. कारण, छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी, धर्मासाठी स्वराजासाठी त्याग केला. संभाजी महाराजांवर औरंगाजेबाने अत्याचार केले, तरीही धर्म आणि स्वराज्यासाठी त्यांनी तडजोड केली नाही. धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही.
संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सारख्यांनी असं बोलणं योग्य नाही. सर्व माहिती घेऊन त्यांनी बोललं पाहिजं. कारण, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर अजित पवारांनी टीका केली होती. पण, अशा प्रकारचं वक्तव्य निंदाजनक आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवार नेमके काय म्हणाले अधिवेशनात
अधिवेशनात बोलताना अजित पवार म्हणाले, आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती, याची आठवण सभागृहात करून दिली.
विशेष म्हणजे, अधिवेशन काळात अजित पवार यांच्या वक्तव्याचे भान सत्ताधारी बाकावरील कोणत्याही आमदाराला आले नाही. मात्र अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर मात्र त्या विषयीचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.