Breaking News

बच्चू कडू म्हणाले, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो शरद पवारांवरही साधला निशाणा

मागील काही दिवसांपासून खोक्यावरून भाजपासमर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेवरून दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर आज बच्चू कडू यांनी आधीच जाहिर केल्याप्रमाणे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून म्हणाले, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. अन्यथा उगीच हातपाय हलवावे लागले असते असे स्पष्ट केले.

अमरावतीत प्रहार संघटनेच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बच्चू कडू यांनी शक्ती प्रदर्शन करत जाहिर सभा घेतली. त्यावेळी कडू बोलत होते.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, कोणीही यावं आणि काहीही म्हणावं एवढे आम्ही सोप्पं नाही. पहिली वेळ असल्याने माफ करतो. पण, यानंतर कोणीही आमच्याविरुद्ध बोललं, तर ‘प्रहार’चा वार दाखवू. आम्ही गांधीजींना मानतो, मात्र भगतसिंह डोक्यात आहे असा सूचक इशाराही दिला.

रवी राणांनी दिलगीरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण, रवी राणांनी मोठेपणा घेत चूक लक्षात आली आणि माफी मागितली, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले, आम्ही चार पावले मागे घेऊ. विनाकारण आम्हाला उर्जा संपवायची नाही आहे, असेही ते म्हणाले.

राजकारण हे राजकारणासारखं करावं लागेल आणि तत्त्व हे तत्त्वांसारखी पाळावी लागतील. या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. केवळ तत्त्व पाळत राहिलो आणि काम काहीच केलं नाही, तर त्या तत्त्वांना किंमत उरत नाही. लोकांच्या दु:खावर कुठेतरी मलमपट्टी करता आली पाहिजे. आम्ही उगीच गुवाहाटीला गेलो नाही. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. मंत्री असतानाही मला गुवाहाटीला जाण्याची गरज काय होती. मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभा राहिलो, तो घटक महत्त्वाचा आहे असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचे समर्थन त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३८ मध्ये काँग्रेसला ‘जळतं घर’ म्हटलं होतं. काँग्रेसशी मैत्री म्हणजे ‘मुंगूस आणि सापाची’ मैत्री असंही ते म्हणाले होते. तरीही बाबासाहेबांची तत्त्व महत्त्वाची होती. राजकारणात आलटापालट होऊ शकते. पण मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभं राहिलो तो घटक महत्त्वाचा आहे. त्याचं खरं स्वातंत्र महत्त्वाचं आहे. ही सगळी सत्ता त्या वंचितांपर्यंत नेण्याचं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना ‘जळतं घर’ म्हटलं त्यांच्यासोबतच बाबासाहेब बसले आणि संविधान समितीचे सदस्य झाले. यानंतर त्यांनी घटना तुमच्या हाती दिली. निर्णय कडू असले तरी काम गोड करता आलं पाहिजे असेही ते म्हणाले.

शिवाजी महाराजांनी तर कित्येकदा तह केले. माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये, या भावनेतून जेव्हा छत्रपतींनी म्यानातून तलवार बाहेर काढली, तेव्हा त्यांनी तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नाही. कधी आदिलशहा तर कधी मुघलांनासोबत घेऊन महत्त्वाचं ध्येय साध्य केलं. याला तुम्ही बंडखोरी म्हणता का? हा उठाव आहे. शरद पवारांनी २०१४ मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्यांच्यासाठी सोयीचा होता. पण तेव्हा कुणीही बोललं नाही. गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं प्रेम केलं तर त्यांचं ‘लव्ह मॅरेज’ असे सांगत बच्चू कडू म्हणाले, आमचाही उठाव होता, हम छोटे हैं लेकीन दिलदार है” अशी शायरी ऐकवित आपल्या उठावाचे समर्थनही केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *