जसजशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी जवळ येत आहे तसतसे बंडखोर गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या राजकिय धक्के देत हादरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने या दोघांसह माजी खासदार आनंदराव आडसूळ यांची फुटीर गटाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या नेतेपदी वर्णी लावण्यात आली.
त्यातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गेल्यानंतर शिवसेनेत नेत्यांना किंमत राहिली नसल्याची खंत रामदास कदम यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली.
त्यानंतर मुख्यमंत्री तथा फुटीर गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे म्हणाले, बंडखोर आमदारांमध्ये रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदमदेखील आहेत. मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार आहे. आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे याबद्दल सर्वांना माहिती आहे. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्यासोबत होत्या असे सांगत रामदास कदम यांनाही आपल्या गटात सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी अप्रत्यक्ष सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान एकाबाजूला शिवसेनेतून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत असले तरी पुढील ऑगस्ट महिन्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवरील अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर २० जुलै रोजी सुनावणी होत आहे. त्यामुळे या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे शिवसैनिकांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबरोबरच शिंदे गटाच्या अस्तित्वाचाही निकाल लागणार आहे.
दरम्यान, रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेतेपदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीआधी आपण मला अचानक मातोश्रीवर बोलवून घेतले आणि मला आदेश दिले की, यापुढे तुमच्यावरती कोणतीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. तसेच आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी पायमल्ली केल्याने आपण शिवसेना पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.