शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा ठोकला. याप्रश्नी ज्या नबाम रेबिया या खटल्याचा संदर्भ देण्यात येतो त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय खंडपीठा समोर झाली होती. मात्र आता परिशिष्ठ १० मधील सुधारणेनंतर या याचिकेची सुनावणीही ७ सदस्यांच्या खंडपीठासमोर घेण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी या प्रकरणात नबाम रेबिया खटला लागू होतो की परिशिष्ट १० लागू होतो याविषयीचा दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे ठाकरे गटाने मागणीप्रमाणे ही याचिकेची सुनावणी ५ सदस्यीय की ७ सदस्यीय खंडपीठ सुनावणी घेणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सदसदविवेकबुद्धीवर आमचा विश्वास आहे. रामशास्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत. म्हणून न्यायालय जिवंत आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास असल्याचे मत व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, शिवसेना कोणती खरी आणि कोणती खोटी हे जनता ठरवेल. उद्या न्यायालयाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्देश तरी आमची तयारी आहे. हा निकाल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि हा निकाल देशासाठी दिशादर्शक ठरावा हीच आमची भूमिका आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुढे बोलताना त्यांनी भाजपालाही लक्ष्य केलं. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटाचे नेते वारंवार सांगतात की निकाल आमच्याच बाजुने लागेल. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्या स्पष्ट सांगितलं की निकाल आपल्या बाजुने लागेल. याच्यात हा आत्मविश्वास येतो कुठून? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.