शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
हा बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवकणीचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल. सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणार आहेत. राज्याच्या विकासाचा गाडा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याआधी मी या सरकारचा भाग नसेन. मात्र हे सरकार सुरळीत चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विनंती केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले.
या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे यांचे संपुर्ण कुटुंबिय उपस्थित होते. तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या हातात त्यांची नातं ही होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी आपला कुटुंबवत्सल पणा त्यांचा कमी झालेला नसल्याचे एकप्रकारे त्यांनी दाखवून दिले.