Breaking News

राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली.

मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६५७४ होती, ती ७७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४ टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७, ५२८ इतक्या झाल्या, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४,८०१इतकी झाली. ही वाढ ४२ टक्के आहे. ऑगस्टचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४ टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक आहे.

देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे आहे. भारताच्या सरासरीपेक्षा अधिक चाचण्या करणार्‍या राज्यात गोवा (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (८४७), आसाम (७४८), कर्नाटक (७४०), बिहार (६५०), तेलंगाणा (६३७), उत्तराखंड (५९०), हरयाणा (५६३) इतकी आहे. भारताची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणार्‍या राज्यांत सुद्धा महाराष्ट्र नाही. राजस्थान (४.१८टक्के), उत्तरप्रदेश (४.५६), पंजाब (४.६९ टक्के), मध्यप्रदेश (४.७४ टक्के), गुजरात (५.०१ टक्के), बिहार (५.४४टक्के), हरयाणा (५.५१ टक्के), ओरिसा (५,७१ टक्के), झारखंड (६.१९ टक्के), गोवा (८.०५ टक्के), तामिळनाडू (८.१० टक्के), भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे.

अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, साताऱ्यात खाटांची क्षमता अधिक वाढविणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करून देणे, अशा सूचनांचा यात समावेश आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *