मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशामागे राष्ट्रवादी काँग्रेसची अडेलतट्टू भूमिका असल्याचा आरोप काँग्रेसमधील विखे-पाटील गटाने केला. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या संभावित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सुजय यांनी व्यक्त केली होती. मात्र सदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्याने ती जागा मागण्याचे प्रयत्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुरु केले. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून ती जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली. मात्र पवारांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला देण्याची विनंती अमान्य केली. जर पवारांनी ही विनंती मान्य केली असती ही वेळ आली नसती अशी भावना विखे-पाटील गटातील एका आमदाराने सांगितले.
काल शरद पवार यांची माढा लोकसभा निवडणूकीतून माघार घेत असल्याबाबत पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेनंतर अगदी संध्याकाळी शेवटी सुजय विखे-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत अहमदनगरची लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दाखविण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने अखेर सुजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यासंदर्भात दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कानी याबाबतची माहिती यापूर्वीच दिली. परंतु पवारांच्या सुरुवातीच्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठींनी मवाळ भूमिका घेतली. या मवाळ भूमिकेचा फटका म्हणजे सुजय यांचा भाजप प्रवेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिल्लीला पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेल्याचेही त्यांनी सांगितले.